Sunday, November 28, 2010

मनोरथ

मनोरथांचिया धारसा । वाहणें जयाचिया मानसा ।
पूरीं पडिला जैसा । दुधिया पाहीं ।।

मनोरथ, संकल्प कशाचा करायचा हे सुद्धा महत्त्वाचे आहे. संकल्पाशिवाय प्रगती होत नाही. तो संकल्प सिद्धीस नेण्यासाठी प्रयत्न केले जातात. रात्रंदिवस झटतो. मन त्यातच गुंतते. कधीतरी तो पूर्ण होतो. कधी पूर्ण ही होत नाही. पण आपण पूर्ण होईल या आशेने त्यामध्ये कार्यरत असतो. मनोरथ पूर्ण झाला नाही तरी मन समाधानी असावे. आशा सोडायची नाही. अपयशी ही यशाची पहिली पायरी आहे. असे समजून त्यामध्ये प्रयत्न करत राहायचे. वादळे ही होतच राहतात. जीवनात चढ उतार हे येतच असतात. प्रवासात कधी डोंगर अडवा येतो तर कधी खोल दरी येते. पण प्रवास मध्येच सोडून देता येत नाही. अपेक्षित ठिकाण गाठण्यासाठी येणाऱ्या अडचणीवर मात ही करावीच लागते. वादळ आले तर सुरक्षित जागा शोधावी लागते. यासाठी संकल्प करतात. योग्य ते नियोजनही आवश्‍यक आहे. म्हणजे येणाऱ्या अडचणीवर सहजपणे मात करता येईल. उद्दिष्ठ गाठता येईल. कामात नियोजनाचा अभाव असेल तर अपयश येण्याची शक्‍यता असते. यासाठी योग्य ती तयारी करणे आवश्‍यक आहे. नुसते प्रयत्न करून चालत नाहीत. नियोजनबद्ध पद्धतीने काम करीत राहिल्यास प्रगती होत राहते. निराशा येत नाही. काळजी, भीती वाटत नाही. दूरगामी विचार करून नियोजन करावे म्हणजे संकल्पात येणारे अडथळे कमी होतील. मनाचा दृढ संकल्प हा उद्दिष्ठ गाठण्यात यशस्वी ठरतो हे विसरता कामा नये. लक्ष साधताना मनाची स्थिरता ही आवश्‍यक आहे. मन भरकटता कामा नये. पुरात पडलेला भोपळा प्रवाहात वाहत जातो. तसे मन भरकटते पण ते संकल्पावर स्थिर करणे आवश्‍यक आहे. आलेल्या अडथळ्यांवर मात करीत पुढे चालत राहावे. नियोजनबद्ध कार्यक्रम कधीही अपयशी ठरत नाही.

राजेंद्र घोरपडे, पुणे

No comments:

Post a Comment