Sunday, November 21, 2010

डोळसपणा

आंधळे नि हातीं दिवा । घेऊनि काय करावा ।
तैसा ज्ञाननिश्‍चयो आघवा । वायां जाय ।।

जगात भौतिक प्रगतीचा वेग प्रचंड आहे. दररोज नवनवीन तंत्रज्ञान समोर येत आहे. शहरात प्रचंड प्रगती होत आहे. ग्रामीण भाग आजही अंधारात आहे. प्रगतीच्या वाटा आहेत पण त्यांना मार्गदर्शन करणारा त्यांची प्रगती साधणारा असा जिवाभावाचा कोणी साथीदार त्यांच्याकडे नाही. यामुळे विकासात अडथळे येत आहेत. विकासामुळे शहरातील जीवन हे धकाधकीचे झाले आहे. हे ही तितकेच खरे आहे. आठवड्याची सुटी आता सुटी वाटत नाही. निवांतपणा हा राहिलेलाच नाही. अनेक कामे बाकी राहिलेलीच असतात. अशाने शांती ही नाहीच. देहाच्या सुखासाठी सारीही धडपड सुरूच आहे. पण हे सुख क्षणभंगुर आहे, हे लक्षातही घ्यायला वेळ नाही. क्षणिक सुखाच्या मागे धावणारा हा वर्ग आता कायमस्वरूपी सुखापासून दुरावत चालला आहे. अशाने आगामी काळात शांती शोध घेऊनही मिळणे कठीण होईल असे वाटू लागले आहे. कर्म हे करावेच लागणार आहे. ते चुकणार नाही. टाळताही येणार नाही. स्पर्धेचे युग आहे. स्पर्धेतून प्रगती होते हे ही खरे आहे. पण ही स्पर्धा कोणाशी करायची व कशाची करायची हे समजून घेणे आवश्‍यक आहे. जीवघेणी स्पर्धा ही स्पर्धा नव्हे. सांगण्याचा हेतू इतकाच की या नव्या युगात आंधळ्यासारखा व्यवहार नको. आंधळ्याची हाती दिवा जरी दिला तरी त्याला वाट शोधता येत नाही. त्याला त्याचा उपयोग होत नाही. यासाठी कोणताही व्यवहार करताना, कर्म करताना ते डोळसपणे करावे. म्हणजे योग्य मार्ग सापडतील. तरच खरी प्रगती साधता येईल. ज्ञान आहे पण त्या ज्ञानाचा उपयोग करायला शिकले पाहिजे. नुसते ज्ञान असूनही काही उपयोग नाही. आज अनेकांकडे संगणक आहे. इंटरनेट सुविधा आहे पण त्याचा वापर कसा करायचा हेच माहीत नाही. याचा योग्य कामासाठी उपयोग करून घेता येणे आवश्‍यक आहे. उपलब्ध प्रत्येक साधनाचा योग्य वापर करण्याची बुद्धी असायला हवी. दुरपयोगात स्वतःचेच नुकसान आहे. यासाठी व्यवहारात डोळसपणा हवा.

राजेंद्र घोरपडे, पुणे

No comments:

Post a Comment