Wednesday, October 6, 2010

दूरदृष्टी

व्यापक आणि उदास । जैसें कां आकाश ।
तैसें जयाचें मानस । सर्वत्र गा ।।

जुन्या पिढीतील लोकांमध्ये दूरदृष्टी अधिक होती. सध्याच्या पिढीत तितकीशी दूरदृष्टी दिसून येत नाही. पूर्वी लोकांवर अध्यात्माचा, भारतीय संस्कृतीचा मोठा पगडा होता. या संस्कृतीतच मुळात दूरदृष्टीचा विचार मांडला गेला आहे. अमेरिकेला दूरदृष्टी अधिक आहे असे म्हटले जाते. त्यामुळे ते आज प्रगत आहेत. असेही सांगितले जाते. पण प्रत्यक्षात तेथे सुरू असलेल्या मंदीच्या बातम्या वाचल्यानंतर असे वाटते की, त्यांनी शोध लावले, तंत्रज्ञान विकसित केले पण त्याच्या वापरात दूरदृष्टीचा अभाव होता असे मानावेच लागेल. कदाचित मी म्हटलेले चूकही असेल, पण सध्या तेथे मंदी आहे हे खरे आहे. म्हणजे त्यांच्या नियोजनात दूरदृष्टीचा अभाव आहे हे निश्‍चित. भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत दूरदृष्टी असणारे अनेक थोर नेते होते, यामुळे आपला देश स्वतंत्र झाला. दूरदृष्टी असणाऱ्या त्यांच्या कार्यामुळे, त्यांच्या योगदानामुळे विकासाला मोठी चालना मिळाली. देशाचा विकास हेच त्यांचे ध्येय होते. संतांप्रमाणेच या लोकप्रतिनिधीमध्ये त्यागीवृत्ती होती. स्वातंत्र्यासाठी त्यांनी त्याग केला. पण आताच्या काळातील तरुणांत, लोकप्रतिनिधीमध्ये अशी त्यागीवृत्ती नाही. जुन्या पिढीतील लोकप्रतिनिधीप्रमाणे त्यागीवृत्ती असणारे, दूरदृष्टी असणारे लोकप्रतिनिधी आता क्वचितच पाहायला मिळतात. आणि असले तरी सध्याच्या राजकारणात त्यांचा निभाव लागणे तसे कठीणच वाटते. मुळात ते सध्याच्या राजकारणात उतरण्यास नापसंती दर्शवितात. हे ही तितकेच खरे आहे. इतका काळ बदलला आहे. पण देशाच्या विकासासाठी आणि सार्वभौमत्वासाठी नव्यापिढीत दूरदृष्टी असणे गरजेचे आहे. अध्यात्मातून दूरदृष्टीचा विचार करण्याची प्रेरणा मिळते. व्यापक विचार करण्याची वृत्ती उत्पन्न होते. यासाठी आध्यात्मिक विचारांची कास नव्या पिढीने धरायला हवी. संतांनाह
ी दूरदृष्टी असणारे भक्त अधिक प्रिय असतात. निरपेक्ष, शुद्ध, तत्त्वार्थी देखणा, उदासीन, संसारदुःख विरहित, निरहंकारी असा भक्त सद्‌गुरुंना अधिक जवळचा वाटतो. असा भक्त आध्यात्मिक प्रगती साधतो. भौतिक विकासातही अशा व्यक्ती पुढे असतात. त्यांच्या दूरदृष्टीचा फायदा अनेकांना होतो. सध्याच्या राजकारणात अशा व्यक्तींची गरज आहे. तरच देशाचे भवितव्य उज्ज्वल राहील.



राजेंद्र घोरपडे, पुणे

No comments:

Post a Comment