Friday, November 25, 2016

रांग आमच्या सवयीची

रांग आमच्या सवयीची
रांग आमच्यासाठी नित्याची
लहानपणी होती रेशनची रांग
साखर धान्य होते महाग
रॉकेलचा होता तुटवडा
त्याच्या थेंबा थेंबासाठी करावी लागे धडपड
थोडे शिकलो मोठे झालो
महाविद्यालयात प्रवेशासाठी गेलो
तेथेही मग रांगेत थांबायला शिकलो
पदवी प्रमाणपत्र घेतानाही रांगेत थांबलो
नोकरी मिळवण्यासाठी रांग
मुलाखत देण्यासाठी रांग
पैसा कमवल्यावर बिले भरण्यासही रांग
खते बियाणे खरेदीसाठीही रांग
थोर सांगत हवी रांगेच्या संघर्षाची सवय
तरच मिळेल जीवनात यश, ऐश्वर्य
यासाठीच सरकार लोकांना लावतेय
आयुष्यभर वेगवेगळ्या रांगांची सवय
राजेंद्र घोरपडे

Saturday, October 8, 2016

गुणवत्तापूर्ण बिस्किटे हीच ठरली ओळख...

हेर्ले (ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) येथील पद्मश्री सचिन तेरदाळे यांनी डिसेंबर २०१४ मध्ये सुरवातीला छोट्या प्रमाण घरगुती स्तरावर बिस्किटे तयार करून देण्याचा व्यवसाय सुरू केला. वर्षभरात या व्यवसायाने चांगली गती घेतली. आज त्यांनी स्वतःचे बिस्कीट विक्रीचे दुकान सुरू केले आहे. 

राजेंद्र घोरपडे 

घरातील दैनंदिन काम संपल्यानंतर उर्वरित वेळेत घरगुती स्तरावर लहानसा प्रक्रिया उद्योग सुरू करावा, असे महिलांना वाटते. हेर्ले (ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) येथील पद्मश्री तेरदाळे यांचीही अशीच इच्छा होती. पद्मश्री यांच्या काकांचा एरंडोली(जि. सांगली) या गावी घरगुती बिस्किटे तयार करण्याचा व्यवसाय आहे. हा व्यवसाय पाहिल्यानंतर पद्मश्री यांनाही बिस्किटेनिर्मिती करण्याचे ठरवले. डिसेंबर २०१४ मध्ये त्यांनी एक किलो क्षमतेचा ओव्हन खरेदी करून गावामध्येच बिस्किटे तयार करून देण्याचा व्यवसाय सुरू केला. सुरवातीला गावातील लोकांकडून बिस्किटे तयार करण्याबाबतची मागणी असायची. एका किलोसाठी पन्नास रुपये या मजुरी दराने त्या बिस्किटे करून देतात. बिस्किटासाठी लागणारे सर्व साहित्य ग्राहकांकडून घेऊन त्यांना लागेल, त्या पद्धतीची बिस्किटे त्या तयार करून देतात. एक किलो बिस्किटे तयार करण्यासाठी डिझेल, वीज आणि बेकिंगचे साहित्य असा सरासरी २० रुपये इतका खर्च येतो. व्यवसाय सुरू केल्यानंतर त्यांना गावातील नागरिकांच्याकडून दररोज चार ते पाच किलो बिस्किटांची मागणी मिळू लागली. यातून खर्च वजा जाता त्यांना रोजचे १०० ते १५० रुपये मिळायचे. गावातील मागणीच्या व्यतिरिक्त पद्मश्री यांनी स्वतःही बिस्किटे तयार करून छोट्या प्रमाणात विक्री सुरू केली. गहू, नाचणी बिस्किटे, नारळ, गव्हाची नानकटाई, नमकिन बिस्किटे, कमी साखरेची बिस्किटे, नाचणी आणि गहू मिश्रीत बिस्किटे अशी विविध प्रकारची उत्पादने त्यांनी विकण्यास सुरवात केली.

‘स्वयंसिद्धा’ने दिली दिशा 
कोल्हापुरातील ‘स्वयंसिद्धा’ या संस्थेतून पद्मश्री तेरदाळे यांना बिस्किटे निर्मिती व्यवसायाबाबत पूरक मार्गदर्शन मिळाले. या संस्थेतर्फे दर बुधवारी कोल्हापुरात महिला व बचत गटांनी तयार केलेल्या वस्तूच्या विक्रीसाठी दुपारी बारा ते तीन या वेळेत बाजार भरविण्यात येतो. तेथे पद्मश्री यांनी बिस्किटांची विक्री सुरू केली. या बाजारानंतर महिलांना संस्थेतर्फे विविध विषयांतील तज्ज्ञांचे मार्गदर्शन करण्यात येते. वाणीमुक्ती कार्यशाळेतून कसे बोलायचे, व्यवसाय कसा करायचा, विक्रीसाठी कशाची आवश्‍यकता आहे, याची माहिती महिलांना देण्यात येते. यातून पद्मश्री यांना प्रेरणा मिळाली. स्वयंसिद्धा संस्था अनेक ठिकाणी महिलांनी तयार केलेल्या उत्पादनांचे प्रदर्शन भरविते. या माध्यमातूनही पद्मश्री यांनी बिस्किटांची विक्री वाढविली.

महिलांना रोजगाराची संधी ः 
पद्मश्री सध्या दररोज ३० किलो गव्हापासून सुमारे ६० किलो बिस्किटांची निर्मिती करतात. त्या स्वतः दररोज बिस्किटे निर्मिती करतात, त्याच बरोबरीने त्यांनी गावातील सात महिलांना रोजगाराची संधी दिली आहे. कधी बिस्किटांच्या निर्मितीचे काम जास्त असते, कधी कमी असते. सहकारी महिलांना त्या तासाला १२ रुपये इतकी हजेरी देतात. दिवसाला पाच ते आठ तासांचे काम या महिलांना मिळते.

कार्यशाळेत मार्गदर्शन ः 
स्वयंसिद्धा संस्थेमार्फत सांगोला (जि. सोलापूर) येथे आयोजित कार्यशाळेत पद्मश्री तेरदाळे यांनी बिस्किटेनिर्मिती व्यवसायाबद्दल महिलांना मार्गदर्शन केले. तेथे त्यांनी बिस्किटांची विक्रीही केली. त्यांच्या उच्च प्रतिच्या बिस्किटांचे कौतुक तर झालेच या व्यतिरिक्त त्यांना येथून दरमहा सहा किलो बिस्किटांची कायमची मागणी मिळाली.

कुटुंबाचे मिळाले सहकार्य ः 
पद्मश्री यांचे पती सचिन हे बिस्किटांच्या विक्री व्यवस्थेसाठी मदत करतात. बिस्किटे निर्मितीसाठी महिन्याला २०० किलो गहू, २५ किलो घरगुती साजूक तूप, ४० किलो लोणी आणि ७० लिटर डिझेल लागते. लोणी हे नृसिंहवाडी, कवठेपिरण आदी गावांतील शेतकऱ्यांकडून खरेदी केले जाते. पद्मश्री यांच्या सासू चंपाबाई या दळण, कांडपापासून ते मालाच्या खरेदी-विक्रीसह कामगारांच्यावर देखरेख ठेवतात. छोट्या गावात हिमतीने घरगुती बिस्किटे निर्मितीचा उद्योग सुरू केल्याबद्दल स्वयंसिद्धा संस्थेने पद्मश्री यांना सौ. मंदा देवेंद्र आचार्य पुरस्कार देऊन गौरविले आहे.

गुणवत्तेमुळे व्यवसायवृद्धी ः 
तेरदाळे यांनी बिस्किटाचे उत्पादन करताना अधिक नफ्यापेक्षा गुणवत्ता हाच निकष ठेवला. बिस्किटे निर्मितीसाठी चांगल्या दर्जाचे घटक त्या वापरतात. विशेषतः लोणी, तूप, दूध हे घरगुतीच वापरले जाते. चांगल्या गुणवत्तेमुळे दरमहा बिस्किटांची मागणी वाढत आहे.

मोठ्या क्षमतेच्या यंत्रांची खरेदी ः 
तेरदाळे यांना वाढत्या बिस्किटांच्या मागणीमुळे एक किलो क्षमतेचा ओव्हन वापरावर मर्यादा आल्या. पीठ मळण्यासाठी मोठ्या यंत्राची गरज वाटू लागले. लहान यंत्रामुळे काम वेळेत होण्यास अडचणी येत होत्या. हे टाळण्यासाठी पद्मश्री यांनी पीठ मळण्यासाठी एक लाख रुपये किमतीचे मिक्‍सिंग मशिन आणि तीन लाख रुपये किमतीचे चार किलो क्षमतेचा ओव्हन खरेदी केला.

बिस्किट विक्रीसाठी शॉपी ः 
तेरदाळे यांनी बिस्कीट विक्रीसाठी कोल्हापुरातील राजारामपूरीमध्ये शॉपी सुरू केली. येथे दररोज बिस्किटांच्या विक्रीतून सरासरी तीन हजार रुपये मिळतात. या व्यतिरिक्त बाहुबली, कुंथगिरी, सोलापूर, पुणे येथेही विक्रीसाठी बिस्किटे त्या पाठवितात.

परदेशातूनही मागणी 
ऑस्ट्रेलिया, अमेरिका येथे जाणाऱ्या कोल्हापुरातील व्यक्तींकडून वर्षातून तीन ते चार वेळा बिस्किटांची मागणी होते. साजूक तुपातील एक किलो बिस्किटे विक्रीचा दर २५० रुपये आहे, तर परदेशात बिस्किटे पाठविण्याचा कुरिअरचा खर्च ८१० रुपये प्रति किलो इतका आहे. मात्र गुणवत्ता आणि चव यामुळे परदेशातूनही मागणी असल्याचे पद्मश्री सांगतात.

संपर्क ः पद्मश्री तेरदाळे ः ८४२१४८२८४४

Monday, October 3, 2016

व्यक्तीमत्व विकास....

व्यक्तीमत्व वागण्यातून दिसते. तुम्ही किती उद्धट आहात हे आपल्या कृतीतून दिसून येते. त्यासाठी दुसऱ्याने सांगण्याची गरज नाही.
काही दिवसापूर्वी मी असाच एक व्हिडिओ पाहीला. त्यामध्ये अमेरिका व प्रान्सच्या विचारसरणीत कसा फरक आहे. ते दाखवले होते. हे बोलके चित्र खूप काही सांगून जाते. यातून बरेच काही घेण्यासारखे आहे. अमेरिकेत जादा झालेला शेतमाल समुद्रात फेकून दिला जातो. इतकेच नव्हेतर स्टोअर किंवा माँलमध्ये विक्री न झालेले माल भंगारात काढण्यात येतो. तोही कचऱ्यात टाकून दिला जातो. तेथे श्रीमंती आहे. मालाची किंमत नाही. पण यातून अमेरिकेची विचारसरणी कशी आहे याचाही प्रत्यय आपणास येतो. त्याच्या विचारात माणूसकी नाही. याचेही दर्शन होते. पण या ऊलट फ्रान्समध्ये मात्र जास्त झालेला शेतमाल गरजूंना वाटला जातो. स्टोअर किंवा माँलमध्ये जास्त दिवस न विकलेला मालही गरजूंना मोफत वाटला जातो. यातून त्या देशात श्रीमंती कमी आहे असे वाटते. तेथे काही गरजू आहेत. असेही दिसते पण त्याच बरोबर त्यांच्या विचारात माणूसकी आहे. वस्तू टाकावू झाली तरी तिचा योग्य वापर करता येऊ शकतो. एखाद्या गरजूचे पोट त्यातून भरु शकते हा विचार आहे.
हा फरक आहे या दोन देशातला. भारताने यावर जरूर विचार करावा. कोणाशी कसे वागायचे कोणा कडून काय घ्यायला हवे याचाही विचार करायला हवा. परराष्ट्र धोरण ठरविताना हा विचार जरुर विचारात घ्यायला हवा. कदाचित हा एखाद्या देशाबाबत केलेला अपप्रचारही असेल पण यातून शिकण्यासारखे निश्चितच आहे. हे ही विचारात घ्यायला हवे. या दोन्ही देशांशी आपण व्यवहार करताना हा विचार जरुर विचारात ठेवायला हवा.
आपणाकडेही शेतकरी मालाला भाव नाही म्हणून शेतमाल फेकून देतो. त्याने तसे न करता गरजू व्यक्तींना तो वाटला तर त्याला पुण्य मिळेल. मालाला दर मिळाला नाही म्हणून नुकसान झाले खरे पण एखाद्या गरजूचे पोट तरी भरले हे पुण्य पदरात पडले. असा विचार करून जर त्याने व्यवहार केला तर तो नुकसानीने हताश, निराश न होता पुण्याच्या शिदोरीने तो आत्महत्येच्या विचारापासून दूर जाऊ शकतो. हे ही विचारात घ्यायला हरकत नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी असा माणसिक आधार त्याला द्यायला हवा. पुण्याचा विचार माणसामध्ये सद्विचार आणतो. सद्संगतीने धैर्य येते. दुष्ट विचारांना आळा बसतो. चुकीच्या मार्गाचा स्वीकार होत नाही. यासाठी नेहमी पुण्य कसे पदरता पाडता येईल याचा विचार करायला हवा. यातून आपले जीवन समृद्ध करायला शिकले पाहिजे.  

Saturday, September 3, 2016

वडिलांच्या प्रेरणेमुळे शेतीमध्ये जपली प्रयोगशीलता

संडे फार्मर
--------------------------------


वडिलांचे शेतीतील कष्ट, प्रयोगशीलता यांचा आदर्श ठेवून सुरेश दगडू काटकर यांनी गावाकडील शेतीशी नाते कायम ठेवले आहे. कोल्हापूर शहरामध्ये सब पोस्टमास्तर पदावर कार्यरत असणाऱ्या सुरेश काटकर यांनी शेतीमध्ये प्रयोगशीलता जपली आहे. कृषी अधिकारी, प्रयोगशील शेतकऱ्यांच्या मार्गदर्शनातून पीक फेरपालटीवर त्यांचा भर असतो.

राजेंद्र घोरपडे

तेलवे (ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर) येथे सुरेश काटकर यांची चार एकर शेती आहे. सुरेश यांचे वडील दगडू सखाराम काटकर हे फारसे शिकलेले नसले तरी कष्टातून त्यांनी मुलांना शिकवले. शेतीमध्ये उत्पादन वाढीसाठी प्रयोगशीलता जपली. वयाच्या ८७ व्या वर्षीही ते शेतीच्या नियोजनात रमलेले असत. आजारपणामुळे त्यांना आता शेतीकडे लक्ष देणे होत नाही; परंतु वडिलांच्या प्रयोगशीलतेचा वसा सुरेश काटकर यांनी जपला आहे. सुरेश हे बांधकाम विषयातील डिप्लोमाधारक. सुरवातीला त्यांनी दोन-तीन वर्षे कंत्राटी व्यवसाय केला. याच दरम्यान त्यांना पोस्ट खात्यात नोकरी मिळाल्यानंतर बांधकाम व्यवसाय सोडला. नोकरीच्या चक्रात अडकल्यानंतर इतर व्यवसाय करणे तितके सोपे नसते. त्यात सरकारी नोकरी असेल तर जबाबदारी जास्तच वाढते. सध्या कोल्हापुरातील शिवाजी पेठेमधील पोस्ट आॅफिसमध्ये सुरेश काटकर हे सब पोस्टमास्तर पदावर कार्यरत आहे. नोकरीतील व्यस्ततेमध्येही त्यांची शेतीची ओढ काही कमी झाली नाही. लहानपणापासूनच शेतीमध्ये गुंतलेले असल्याने नोकरी असूनही आठवड्यातून एकदा तरी कोल्हापूर शहरापासून २५ किलोमीटरवर असणाऱ्या शेतावर जाऊन वाटेकरी, परिसरातील शेतकऱ्यांच्या बरोबरीने चर्चाकरून पीक व्यवस्थापनाचे नियोजन काटकर करतात.

जमिनीनुसार पीक पद्धतीचे नियोजन ः
सुरेश यांची चार एकर शेती आहे. त्यामध्ये अर्धा एकर मळीचे शेत आहे. कासारी नदीपासून सुमारे ३०० मीटरवर अडीच एकर काळवट जमीन आणि एक एकर माळरान आहे. काटकर यांनी नदीवरून पाणीपुरवठा योजना करून सर्व क्षेत्रात पाणी पोचविले आहे. शेतीमध्ये ऊस, सुर्यफूल, भात ही पिके आलटून पालटून घेतली जातात. नदीजवळ असल्याने बारमाही पाणी उपलब्ध होते. सर्व शेती त्यांनी भागाने केली आहे. पाण्याचा खर्च वगळता सर्व खर्च निम्मा-निम्मा विभागून घेतला जातो. तसेच उत्पन्नही निम्मे-निम्मे विभागून घेतले जाते, त्यामुळे शेतीचे आर्थिक नियोजन करणे सोपे जाते. कासारी नदीच्या पूर क्षेत्रात काही जमीन असल्याने काटकर यांना काही वेळा पुराच्या समस्येला तोंड द्यावे लागते. काही वेळा पुराच्या पाण्यात सात-आठ दिवस शेती राहिल्याने पीक नुकसानही सोसावे लागते. पूरबाधित उसाचे करायचे काय हा प्रश्‍न काही वेळा त्यांच्या समोर असतो. हा ऊस काढून मग प्रयोगशील शेतकऱ्यांच्या सल्ल्याने हंगामी पिकाचे नियोजन ते करतात. यामुळे आर्थिक तोटा कमी करणे त्यांना शक्य होते. गेल्या काही वर्षांत त्यांनी कृषितज्ज्ञ आणि प्रयोगशील शेतकऱ्यांचा सल्ला घेत पीक फेरपालटाचे नियोजन केले. त्यामध्ये त्यांना यशही मिळत आहे.
पीक लागवडीबाबत सुरेश काटकर म्हणाले, की काही शेती पूर क्षेत्रात असल्याने जास्तीचा पाऊस झाला, तर पुराचा धोका असतो. तीन, चार दिवस पुराचे पाणी शेतात राहते, त्यामुळे ऊस पिकाशिवाय अन्य पिकांची लागवड शक्य होत नाही. आडसाली लागवडीसाठी तीन फुटांची सरी सोडून उसाची लागवड केली जाते. माती परीक्षण करूनच उसाला सेंद्रिय आणि रासायनिक खताची मात्रा दिली जाते. दर्जेदार बेणे निवडण्यावर माझा भर आहे. प्रयोगशील ऊस शेतकऱ्यांच्या सल्ल्यानेच लागवडीचे केले जाते, त्यामुळे सध्या एकरी ५५ ते ६० टन ऊस उत्पादन मिळते. खोडव्याला माती परीक्षणानुसार पहारीच्या अवजाराने रासायनिक खत दिले जाते, त्यामुळे खताचा योग्य वापर होतो, आर्थिक बचत होते. उसाचा खोडवे तुटून गेल्यानंतर शेतात फेरपालट म्हणून उन्हाळ्यात भात किंवा सूर्यफुलाची लागवड केली जाते.
भातशेतीच्या नियोजनाबाबत काटकर म्हणाले, की पीक फेरपालटीचे नियोजन आणि उपलब्ध क्षेत्र लक्षात घेऊन कधी उन्हाळी तर कधी पावसाळी भात लागवड केली जाते. भात लागवडीसाठी सुधारित जातीचे बियाणे निवडले जाते. त्यामुळे उतारा चांगला मिळतो. प्रयोगशील भात उत्पादकांचे अनुभव लक्षात घेऊन रत्ना, कर्जत तसेच इतर भाताच्या जातींची लागवड करतो. लागवडीसाठी भात रोपे गादीवाफ्यावर तयार केली जातात. चिखलणी करून भात रोपांची पुनर्लागवड केली जाते. दर वर्षी २० गुंठे ते एक एकरावर भात लागवड असते. मला रत्ना जातीचे एकरी सरासरी १६ क्विंटल उत्पादन मिळाले आहे. भात भरडून तांदूळ घरीच वापरतो. काहीवेळा खोडवा गेल्यानंतर दहा गुंठे क्षेत्रावर उन्हाळी हंगामात सूर्यफुलाच्या संकरित जातीची लागवड करतो. या पिकाच्या व्यवस्थापनासाठी पाच हजारांपर्यंत खर्च येतो. सहासरी दहा गुंठ्यांतून चार क्विंटल उत्पादन मिळते. सूर्यफुलाची विक्री न करता घाण्यावरून तेल काढून घेतो. या तेलाचा घरीच वापर करतो. प्रत्येक पिकाच्या व्यवस्थापनाचा हिशेब ठेवला आहे. त्यामुळे नफा, तोटा कळतो. त्यातून पुढील वर्षी सुधारणा करतो.

पाण्याच्या निचऱ्यासाठी चर
काटकर यांची काही जमीन कासारी नदीच्या पूर क्षेत्रात असल्याने काहीवेळा पुराचे पाणी शेतात येते. पूर ओसरल्यानंतरही शेतातील बरेच दिवस पाण्याचा निचरा होत नाही. यामुळे क्षारफुटीचा धोका असतो. त्याचा पीक वाढ आणि उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता असते. हे लक्षात घेऊन काटकर यांनी शेताच्या बाजूला अडीच फूट खोलीचा चर काढून तो वाळू, दगडगोट्यांनी बुजविला. हाच चर पुढे ओढ्याला जोडला. चरामुळे जमिनीतील पाण्याचा लगेच निचरा होऊन वाफसा येतो. त्यामुळे जमीन चांगल्या स्थितीत राहिली आहे.

ॲग्रोवनची होते मदत
पीक व्यवस्थापनाच्या माहितीसाठी सुरेश काटकर यांना ॲग्रोवनची मदत होते. याबाबत ते म्हणाले की, मी ॲग्रोवनमधील लेख लिहिणाऱ्या तज्ज्ञांशी चर्चा करतो. प्रयोगशील शेतकऱ्यांच्या कडून पीक व्यवस्थापनाची माहिती घेतो. काही शेतकऱ्यांच्या शेतीला मी भेटीदेखील दिलेल्या आहेत, त्यामुळे मला माझ्या शेती व्यवस्थापनातील चुका समजतात. पुढील वर्षी मी बदल करतो. त्याचा पीक उत्पादनवाढीस फायदा झाला आहे. कोल्हापूर जिल्हा परिषदेतर्फे आयोजित शिवार फेरीमध्ये मी सहभागी असतो. कृषी अधिकारी सर्जेराव पाटील हे माझे बालमित्र. त्यांच्या सल्ल्यानेच मी दर वर्षीचे पीक नियोजन करतो. आकुर्डे येथील अजित पाटील यांचा पोल्ट्रीचा व्यवसाय पाहून मीदेखील नियोजन केले आहे.

शेतकऱ्यांना गटशेतीचा आधार
गावातील शेती नियोजनाबाबत माहिती देताना काटकर म्हणाले की, आमचे गाव एक हजारपेक्षा कमी लोकवस्तीचे आहे. गेल्या काही वर्षांपासून मजूरटंचाई जाणवू लागली. हंगामाच्या काळात शेती कामाला मजूर मिळत नाहीत. यावर गावकऱ्यांनी गटशेतीचा उपाय शोधला आहे. आता दहा-बारा शेतकऱ्यांचे गट करूनच शेती केली आहे. आलटून पालटून एकमेकांच्या शेतात शेतकरी मदतीला जातात. पीक नियोजन तसेच आवश्‍यक उपाययोजना करण्यासाठी गटशेतीची मला मदत होत आहे. नोकरीमुळे मी गेली वीस वर्षे एकाच वाटेकऱ्याकडे माझी शेती कसण्यासाठी आहे. श्रमाचा योग्य मोबदला त्यांनाही मिळतो, त्यामुळे तेही समाधानी आहेत. नोकरी संपली, की मीदेखील गावी शेतावरच राहण्यास जाणार आहे.

संपर्क ः सुरेश काटकर ः ९४२०००९५०६ 

Monday, August 29, 2016

अभिषेकाचे पुण्य....



अनेक मंदिरात मुर्तींना अभिषेक केले जातात. पण या अभिषेकात वापरले जाणारे दुध वायाच जाण्याचा प्रकार अनेक ठिकाणी पाहायला मिळतो. हे दुध वाहत जाऊन सांडपाण्यात मिसळते इतके भानही लोकांना राहात नाही. तरीही भावनेपोटी हे अभिषेक सुरुच असतात. अशा या प्रथांना कोठेतरी आळा बसायला हवा. काही मंदिरात तर हजारो लिटर दुध असेच वाया जाते. ही प्रथा थांबवण्याचा वसा बेळगावातील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी घेतला. गेले दोन वर्षे कपिलेश्‍वर मंदिरात श्रावणातील सोमवारी होणारे अभिषेक या कार्यकर्त्यांनी रोखले आहेत. हे वाया जाणारे दुध त्यांनी अनाथ व वृद्धा आश्रमांना देऊन एक वेगळा आदर्श उभा केला आहे.

आता मला विचाराल तर आम्हा नव्यापिढीला अभिषेक कोणी सुरु केला याची कल्पनाही नाही. तो का केला जातो हे ही माहीत नाही. ते जाणून घेण्याचीही आमची इच्छा नाही. केवळ परंपरा म्हणून अभिषेक करण्याकडेच आमचा कल दिसतो. पूर्वज सांगतात म्हणून श्रद्धेपोटीच आपण अभिषेक करतो. यात त्या मुर्तीची झिज होते याचे भानही राहात नाही. हा अभिषेक दिवसातून एकदाच करावा याचेही भान नसते. दगडीमुर्तीला देव मानायचे मग त्या दगडावर दुध ओतून ओतून त्याचे सोैदर्य नष्ट होते. हे आपल्या लक्षात कसे येत नाही. देवाचे सौदर्य नष्ट होत असेल तर मग ती पुजा कशी आपणास मान्य होते हेच मुळात समजत नाही. तरीही आपण अभिषेक करतच राहातो. अशा अभिषेकाने कित्येक मंदिरात दुर्गंधीही पसरते. याकडे कोणाचेही लक्ष नसते. हीच देवाची भक्ती का? नव्या पिढीला भक्ती म्हणजे काय याचीही माहिती नसल्याने ही परंपरा म्हणून आपण अंधश्रद्धा जोपासतो आहोत. याबाबत आता प्रबोधनाची गरज आहे. संतांनी भक्ती कशी करावी ? श्रद्धा म्हणजे काय ? पुजा कोणाची होते ? पुजेसाठी काय हवे असते ? हे सर्व सांगितले आहे. पण तरीही आपण याचा अभ्यास करत नाही. विचार करत नाही. मग चुका या होणारच. पण त्या चुका आहेत हे ही आपण मान्य करायला तयार नाही. विज्ञानाने मोठी प्रगती केली आहे. पण तरीही जनता मात्र याबाबत अज्ञानी कशी ? भोळीभाबडी जनता अशा अंधश्रद्धांच्या विळख्यात सापडते. विज्ञान प्रगत झाले पण लोकांच्या भाबडेपणाचा फायदा उठवणारे काही कमी राहीले नाहीत. त्यांनी या प्रगत तंत्राने लोकांची फसवणूक केली जात आहे. फसवणूकही आता हायटेक झाली आहे. आपण फसत आहोत याचेही भान आता जनतेला राहीले नाही. पण काही जागरुक माणसे सामाजिक भान ठेऊन कार्य करत आहेत. समाजाला दिशा देण्यासाठी अशा व्यक्तींची गरज आहे.

कपिलेश्‍वर हे बेळगाव शहरातील प्रसिद्ध मंदिर. या मंदिरात श्रावण महिन्याच्या प्रत्येक सोमवारी देवाला अभिषेक करण्याची प्रथा आहे. हजारो लोक दुधाच्या पिशव्या घेऊन या मंदिरात अभिषेक करत होते. पण हे सर्व दुध गटारीत मिसळले जायचे. दुधाची ही नासाडी रोखण्याचा संकल्प नांदुर गल्लीतील मंडळांनी घेतला. देवस्थांनचे पुजारी व विश्‍वस्थांना विश्‍वासात घेऊन त्यांनी दुधाची नासाडी थांबवण्यासाठी पुढाकार घेतला. दैनिक सकाळनेही या उपक्रमाचे स्वागत करत जनजागृतीसाठी मंडळास सहकार्य केले. दुधाचा अभिषेक करण्यासाठी येणाऱ्या व्यक्तींना विश्‍वासात घेऊन येणारे दुध संकलित करण्याचा उपक्रम हाती घेतला. गेली दोन वर्षे हे कार्य सुरु आहे. शेकडो लिटर वाया जाणारे दुध संकलीत करून अनाथ व वृद्धाश्रमात ते वाटण्यात येत आहे. खरी भक्ती कोणती? खरा धर्म कोणता ? खरे पुण्य कशात आहे ? हे आता जनतेनेच ठरवायला हवे आणि कृती करायला हवी. भक्तीचा खरा अर्थ समजून कृती करायला हवी. बेळगावचा हा उपक्रम देशातील अनेक मंदिरात राबविता येणे शक्‍य आहे. याबाबत जागृतीही करता येणे शक्‍य आहे. अभिषेकाचे पुण्य कशाने मिळेल हे जनतेने समजून घेऊन आता कृती करायला हवी. यासाठी पुढाकार घ्यायला हवा.

देवस्थानच्या परिसरात असे अनेक उपक्रम राबविण्याची आता गरज आहे. अनेक मंदिरात देवळात नारळ फोडले जातात. या नारळातील गोड पाणी शिंपडण्यात येते. पाण्याचे पवित्र विचारात घेऊन कार्य करायला हवे. हे पाणी कोणाच्या तरी पोटात गेल्यास त्याला उर्जा मिळेल. हा विचार का केला जात नाही. एखाद्या आजारी व्यक्तीला हे पाणी दिले तर त्याचा आधार मिळेल. हा विचार का केला जात नाही. यासाठी आवश्‍यक ती यंत्रणा देवस्थानाने उभारायला हवी. अशा विचार का केला जात नाही. दैनिक सकाळच्या तनिष्का गटाने जोतिबा डोंगरावर हा उपक्रम राबविला. त्याला प्रतिसादही मिळाला. नारळाचे वाया जाणारे पाणी साठवून ते शाळा व रुग्णांना ताबडतोब दिले. या उपक्रमाचे कौतुक झाले. अशा या उपक्रमातून देवस्थानात होणारी स्वच्छताही राखली जाते याचा विचार व्हायला हवा.

पुण्य कर्म कोणते हे आता जनतेनेच ओळखायला हवे. तशी कृती करायला हवी. खरी भक्ती कोणती ? खरे अध्यात्म कशात आहे ? देव कोठे आहे ? याचा अभ्यास करुन कृती करायला हवे. हे जाणून घेऊन आपला आचरण करायला हवे. ही जागृती आली तर श्रद्धा काय आणि अंधश्रद्धा काय हे सांगण्याची गरज भासणार नाही.

- राजेंद्र घोरपडे

Tuesday, August 23, 2016

कृष्ण जसा पाहाल तसा तो आहे...

कृष्ण जसा पाहाल तसा तो आहे... 
अभ्यासकांची भावना; अष्टावधानी व्यक्तिमत्त्वाच्या विविध रूपांची छाप

- राजेंद्र घोरपडे


कृष्ण विविध रूपात पाहायला मिळतो. प्रेममय, भक्तिमय, खोडकर असे त्याचे व्यक्तिमत्त्व जनसामान्यांना आपलेसे वाटते. वात्सल्य, शृंगार, भक्ती, करुणा अशा रसांचा आविष्कार कृष्णाच्या व्यक्तिमत्त्वात आहे. प्रेम म्हणजे भक्ती या जाणिवेतून त्याच्यावर काव्य रचना झाल्या. संतांनी विठ्ठल रूपात कृष्णाचे वर्णन केले आहे. कारण पंढरीच्या विठ्ठलात शिव आणि विष्णू अशा दोन्ही तत्त्वांची एकरूपता संतांनी पाहिली आहे. असा हा कृष्ण संत साहित्य अभ्यासकांना कसा वाटतो याविषयी... 


श्रीकृष्ण हे अष्टावधान व्यक्तिमत्त्व आहे. राजनैतिक, युद्धकुशल, चतुरंग योद्धा असा तो आहे. प्रसंगी आपल्या मूल्यांसाठी, स्नेहासाठी तो सारथ्यही पत्करतो. बालवयात तो निरागस खोडकर वाटतो. तारुण्यात तो प्रेमभक्तीत रंगलेला असा वाटतो. त्यानंतर चतुरस्र नेतृत्व करणारे असे त्याचे व्यक्तिमत्त्व आहे. संतांनी कृष्णाचे विविध पैलू मांडले आहेत. संत नामदेवांचा कृष्ण निरागस, निर्मळ असा आहे. संत एकनाथांनी रंगवलेला कृष्ण बालक्रीडेत रममाण झालेला आहे. तो रोमॅन्टिकही वाटतो. संत तुकारामांनी कृष्णाच्या बालक्रीडेवर अभंग रचले. त्यांच्या अभंगातून तो भक्तीचे दैवत म्हणून पाहायला मिळतो. पंडित कवींनी लोकांचे रंजन करणारा, चांगल्या मूल्यांची जपणूक करणारा कृष्ण रंगवला आहे. शाहिरांनी शृंगारप्रधान असे त्याचे चित्र उभे केले आहे. एकूणच कृष्ण जसा पाहाल तसा तो आहे.
- ल. रा. नसिराबादकर, 
संत साहित्याचे अभ्यासक 

भगवद्‌गीतेतील कृष्ण कर्मयोगी, ज्ञानयोगी, भक्तियोगी असा तीन प्रकारचा आहे. अर्जुनाला शिकवण्याचे केवळ निमित्त आहे. त्यामुळे आजच्या जीवनातही त्यातील तत्त्वज्ञान लागू पडते. या तीन गोष्टींनी जीवन आनंदी होते. कर्माच्या मोबदल्यात काय मिळाले याचाच विचार होतो. ते आवश्‍यक असले तरी सध्याच्या पिढीला कर्म करण्याआधीच फळ हवे आहे. श्रद्धेने कर्म केले तर यश जरूर मिळते. परमार्थ करताना व्यवहार ज्ञानही आवश्‍यक आहे. याची सांगड घातली तरच प्रपंच सफल होतो.
- यशवंत पाठक, 
संत ज्ञानदेव अध्यासन प्रमुख, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ 

भगवद्‌गीता म्हणजे कृष्णाने अर्जुनाला युद्धास प्रवृत्त करण्यासाठी सांगितलेला ग्रंथ आहे. यावर अनेक मतमतांतरे आहेत. भगवद्‌गीता कृष्णाने सांगितलीच नाही, असे म्हणणारेही लोक आहेत. पण हिंदू धर्मात तीन ग्रंथ पवित्र मानले जातात. त्यात भगवद्‌गीतेचा समावेश आहे. कृष्णाचे जगणे हे भगवद्‌गीतेसारखे आहे. यासाठी भगवद्‌गीता समजल्याशिवाय कृष्ण चरित्र समजत नाही व कृष्ण चरित्र समजल्याशिवाय भगवद्‌गीताही समजत नाही.
- डॉ. सदानंद मोरे, 
संत साहित्याचे गाढे अभ्यासक 

Sunday, August 21, 2016

मन करा रे प्रसन्न


ज्याने मन जिंकले
त्याचे मन हे उत्तम दोस्त झाले
ज्याने मनाकडून पराभव स्विकारला
त्याचा सर्वात मोठा शत्रू मन हाच झाला

हा मनाचा नियम आहे
यासाठी मनाला नियंत्रित करायचे आहे
मनावर विजय मिळवायचा आहे
मनावर आपल्या ताब्यात ठेवायाचे आहे

मनाला शांती आवडते
तेव्हा मनाला प्रसन्नता येते
मनाला अशांती आवडते
तेव्हा मन हिंसावादी होते

मनाचे हे शास्त्र समजून घ्यायला हवे
त्यासाठी मनाला नियंत्रणात ठेवायला हवे
लोभ, वासनेपासून मन दुर ठेवायला हवे
मन आपल्या ताब्यात यायला हवे

मन करा रे विचार मुक्त
विचार थांबले की व्हाल मुक्त
मग करा एकचाच स्वीकार
सो हम सो हम चा करा गरज

मनाला लाभेल अखंड प्रसन्नता
मनाला लाभेल अखंड शांतता
मन लागेल वेड अध्यात्माचे
मग फुलेले मन आत्मज्ञानाचे

- राजेंद्र घोरपडे

Saturday, August 20, 2016

सावर रे मना...

मन चपळ, चपळ
मन चंचल, चंचल

न राही एके जागी
फिरे सारखे जागो जागी

या मना कसे आवरु
अगणिक विचारांना कसे सावरु

वाऱ्याला रोखू झाडे लावून
प्रकाशाला रोखू भींती उभारुन

सर्वांना आहे विश्रांती
पण मनाला नाही ऊसंत

सतत धावे इकडे तिकडे
सतत राहे भटकत जिकडे तिकडे

एकाग्रतेने कर सोहम सोहम ध्यान
मन त्यावर कर स्थिर होईल मग आत्मज्ञान

- राजेंद्र घोरपडे

Saturday, August 13, 2016

आम्ही प्रकाशबीजे रुजवीत चाललो...

‘श्रमिक सहयोग’ राबवितेय प्रयोगशील उपक्रम 

चिपळूण तालुक्‍यात रुजताहेत विकासाची बीजे 


चिपळूण तालुक्‍यामधील (जि. रत्नागिरी) विविध गावांमध्ये श्रमिक सहयोग ही संस्था निसर्ग शेती, वनसंवर्धन, सूक्ष्म जलविद्युत केंद्र, वंचित समाजासाठी वाडी-वस्त्यांवर अनौपचारिक शाळा असे विविध उपक्रम राबवीत आहे. सन २००४ मध्ये संस्थेने कोळकेवाडी (ता. चिपळूण) येथे ‘प्रयोगभूमी’ हे प्रयोगशील शिक्षण केंद्र सुरू केले. विविध उपक्रमांतून ही संस्था शाश्वत विकासाचे धडे परिसरातील लोकांना देत आहे. 

- राजेंद्र घोरपडे 

कोकणच्या समस्या जाणून घेण्याच्या उद्देशाने रत्नागिरी जिल्ह्यातील काही ध्येयवादी व्यक्तींनी १९८४ मध्ये चिपळूण तालुक्‍यात श्रमिक सहयोग या संस्थेची स्थापना केली. लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी अभ्यासगट, चिंतन शिबिरे, व्याख्याने, तज्ज्ञांचे मार्गदर्शन आदी प्रबोधनात्मक उपक्रम संस्थेने सुरू केले. आदिवासी समाजामध्ये एका पिढीने दुसऱ्या पिढीस शिक्षित करण्याची पद्धती आहे, त्यामुळे या मुलांना शिक्षण देताना अनेक अडचणी उभ्या राहतात. या मुलांना आपला अभ्यासक्रम बोजड वाटतो. हे लक्षात घेऊन त्यांना रुचेल, पटेल अशा भाषेत शिकविण्याची गरज असते. यासाठी श्रमिक सहयोगने मुलांच्या कार्यक्षमता शोधून त्यांना शिक्षण देण्याचा प्रयत्न सुरू केला. ग्रामीण स्त्रिया-युवकांचे प्रबोधन व संघटन, कोकणातील पर्यावरणविषयक तसेच विकासपद्धती विषयक मुद्द्यांची हाताळणी, समाजातील कष्टकरी, वंचित घटकांच्या जीवनधारांच्या अधिकाराच्या मुद्द्यांची हाताळणी, वंचित घटकातील मुलांच्या शिक्षणपद्धतीची मांडणी यावर संस्थेचे कार्य सुरू झाले. चिपळूण, गुहागर, संगमेश्‍वर या तालुक्‍यांतील सुमारे १५० गावांत संस्थेचे कार्य सुरू आहे. संस्थेने पहिली १२ वर्षे कातकरी- आदिवासी समाजाच्या दुर्गम भागातील २६ वाड्यांवर अनौपचारिक शाळा चालविल्या, त्यातून सुमारे ४५० विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतले आहे.

प्रयोगशील निवासी शाळा 
वंचित मुलांच्या विकासासाठी २००४ मध्ये संस्थेने कोळकेवाडी येथे १६ एकर जमीन खरेदी करून प्रयोगशील निवासी शाळा सुरू केली. या शाळेत सध्या ४० मुले शिक्षण घेत आहेत. या मुलांना औपचारिक अभ्यास, व्यवसाय शिक्षण, कला-कौशल्य असे शिक्षण देण्यात येते. या शाळेच्या संचालनासाठी पुणे येथील नवमहाराष्ट्र कम्युनिटी फाउंडेशन (नवम) या संस्थेचे सहकार्य मिळाले होते. प्रयोगभूमीतील मुलांना केंद्र शासनाच्या राष्ट्रीय मुक्त विद्यालय शिक्षा संस्थानमार्फत शालेय शिक्षण व्यवस्थेत सामील करून घेण्यात येते. ‘प्रयोगभूमी’चे संचालन समाजातील शिक्षणप्रेमी व्यक्ती, संस्था, गट यांच्या साहाय्याने चालते. त्यासाठी ‘पालकत्व योजना’ चालविली जाते. नवम (पुणे), एस.पी.ए. एज्युकेशन फाउंडेशन (मुंबई), सकाळ रिलीफ फंड इत्यादी संस्थांचा यात सहभाग आहे.

‘संडे स्कूल’मधून मार्गदर्शन 
डोंगरी भागातील कातकरी समाजात दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण न करणाऱ्या तरुणांची संख्या अधिक आहे. शिक्षणाची इच्छा असूनही त्यांना शिकता येत नाही. अशा तरुणांसाठी प्रयोगभूमीमध्ये ‘संडे स्कूल’ ही संकल्पना राबविली जाते. दर रविवारी तज्ज्ञ शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली या विद्यार्थ्यांचा अभ्यास घेण्यात येतो. सध्या यामध्ये १२ तरुण सहभागी झाले असून, दहावी परीक्षेसाठी त्यांना मार्गदर्शन केले जाते.

स्वयंसहायता गटातून महिला विकास 
चिपळूण आणि गुहागर तालुक्‍यातील ६५ गावांमध्ये संस्थेने २५० स्वयंसहायता गट स्थापन केले आहेत. यातून सुमारे ३७०० स्त्रिया संघटित झाल्या असून त्यांच्या आर्थिक विकासासाठी विविध उपक्रम राबविण्यात येतात. श्रमिक सहयोग परिसरातील सहयोगी गटांना सातत्याने प्रशिक्षण, संशोधन इत्यादी स्वरूपात मदत करते. कोकण संघर्ष समिती, सह्याद्री वाचवा अभियान, कोंकण नारी मंच, आम्ही चिपळूणकर, कृषी वसंत शेतकरी संस्था, आदिम कातकरी आदिवासी संघटना इत्यादी संस्थांना सहकार्य केले जाते.

पुरस्कारांनी गौरव ः 
संस्थेला वीजनिर्मिती व पर्यावरण संवर्धनासाठी महाराष्ट्र शासन व पर्यावरण शिक्षण संस्थेचा पुरस्कार, महाराष्ट्र फाउंडेशन (अमेरिका) यांचा समाजकार्य गौरव पुरस्कार, राष्ट्र सेवा दलाचा साने गुरुजी समाजशिक्षक पुरस्कार
आणि सामाजिक कार्यासाठीचा अस्मि प्रतिष्ठानचा पुरस्कार संस्थेला मिळालेला आहे.

शेकरू महोत्सवाचे आयोजन 
कोयनानगर प्रकल्पाच्या चौथ्या टप्पा परिसरात असणाऱ्या वनांमध्ये पर्यावरणप्रेमींना शेकरू फिरताना आढळले. या निसर्गरम्य परिसरात वन खात्याने शेकरूचा अधिवास असल्याची शासकीय नोंद केल्यानंतर वनसंवर्धनासाठी प्रयोगभूमीने पाऊल उचलले. संपूर्ण परिसरात वृक्षतोडीस बंदी घातली. याबाबत जागृती व्हावी या उद्देशाने संस्थेने आम्ही चिपळूणकर, वन खाते, डी.बी.जे. महाविद्यालय यांच्या सहकार्याने गेल्यावर्षी प्रयोगभूमीमध्ये शेकरू महोत्सव आयोजित केला होता. या वेळी परिसरातील जैवविविधतेची माहिती संकलित करण्यात आली. महोत्सवासाठी उपस्थित निसर्गप्रेमींनी वन परिसरात फिरून, जंगलातील विविध वनस्पती आणि त्यांचे औषधी उपयोग, प्राण्यांच्या पायाचे ठसे, पक्ष्यांचे आवाज, फुलपाखरांचा अधिवास याबाबत माहिती संकलित केली.

सूक्ष्म जलविद्युत प्रकल्प 
कोयना वीज प्रकल्पाच्या परिसरात असणाऱ्या अनेक वाड्या-वस्त्या, तसेच प्रयोगभूमीतही वीज नव्हती. अशा या परिस्थितीवर मात करण्याच्या उद्देशाने श्रमिक सहयोगचा अभ्यास सुरू झाला. नागालॅंडमध्येही डोंगरी भागात ही समस्या आहे. तेथे सरकारने झरे-ओढे, धबधब्याच्या वाहत्या पाण्यावर छोटी जलविद्युत केंद्रे उभारली आहेत. हे पाहून तसाच प्रयोग प्रयोगभूमीत करण्यात आला. प्रयोगभूमीच्या परिसरात वाहणाऱ्या झऱ्यावर २००७ पासून वीजनिर्मिती करण्यात येत आहे. नागालॅंड सरकारच्या सहकार्याने वीजनिर्मितीचे यंत्र येथे बसविले अाहे. वाहत्या झऱ्याचे पाणी १५ मीटर उंचीवर अडवून तेथून पाइपने हे पाणी जल विद्युत निर्मिती यंत्रापर्यंत आणले आहे. या यंत्रात ठराविक दाबाने पाणी सोडून वीजनिर्मिती करण्यात येते. चार-पाच महिने दररोज तीन किलोवाॅट विजेची निर्मिती या यंत्रातून होते.
प्रयोगभूमीने यंदा ‘चला वीजनिर्मिती करूया’ ही कार्यशाळा आयोजित केली होती. पर्यटन, प्रबोधन, मनोरंजन, शिक्षण, प्रत्यक्ष अनुभव असे उद्देश ठेवून आयोजित या कार्यशाळेमध्ये राज्यभरातून अनेकांनी सहभाग घेतला. सहभागी व्यक्तींना या यंत्राची सर्व तांत्रिक माहिती देऊन स्वतः हे यंत्र जोडणी करून वीज तयार करण्याचे प्रात्यक्षिक करण्यास सांगण्यात आले होते.

भाताच्या पारंपरिक जातींचे संवर्धन 
चिपळूण तालुक्‍याच्या डोंगरी भागात खामडी ही पारंपरिक भाताची जात आढळते. सध्याच्या काळात ही जात दुर्मिळ होऊ लागली आहे. प्रयोगभूमीमध्ये दीड एकरावर खामडी (लाल तांदूळ) या भाताच्या पारंपरिक जातीचे संवर्धन करण्यात येत आहे. एसआरआय पद्धतीने भात रोपांची लागवड करण्यात आली असून, सेंद्रिय पद्धतीने व्यवस्थापन केले आहे. संस्थेतर्फे शेतकऱ्यांसाठी भात लागवडीबाबत कार्यशाळा घेण्यात येतात.

संपर्क ः
राजन इंदुलकर ः ९४२३०४७६२०, ८४०८०११२३१

Thursday, August 11, 2016

आमदारांना पगारवाढीच्या अनोख्या शुभेच्छा

आमदारांना पगारवाढ झाली पण देशातील शेतकऱ्यांच्या शेतमालाची किमान आधारभूत किंमत काही वाढली नाही. उसाचा दर काही वाढला नाही. शेतकरी नेते केवळ आता शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा करतात. स्वतःचे नाव कमावतात. खासदारकी-आमदारकीही मिळवतात. मंत्रिही होतात आणि शेतकऱ्यांना विसरतात अशी काहीशी परिस्थिती सध्या तरी आहे. शेतकरी त्यांच्यावर विश्वास ठेवतात कारण त्यांच्या आंदोलनामुळे त्यांच्या उसाला भाव मिळाला. कोणीतरी बोलणारे आहे. म्हणून शेतकरी त्यांच्यावर विश्वास ठेवतो. या विश्वासांचा त्यांनी मान राखायला हवा. हे बोलण्याचा उद्देश याचसाठी कारण पर्वाच आमदारांची पगारवाढ झाली. या आमदारांचे काही शेतकऱ्यांनी अनोखे अभिनंदन केले. असाच एक फ्लेक्स वाचणात आला. त्यावर शुभेच्छुकांची नाव वाचली आणि डोळे उघडले. शुभेच्छुस होते. कपाशीवरील लाल्या रोग अनुदान वंचित शेतकरी, मोसंबी अनुदान वंचित शेतकरी, महागाईने होरपळलेला शेतकरी वर्ग, रंजले गांजलेले सर्व सामान्य शेतकरी. आपणास मिळाले नाही म्हणून काय झाले दुसऱ्याला मिळाले आहे ना. याच भावनेने त्यांनी या आमदारांना शुभेच्छा दिल्या आहेत. अहो आम्हाला मिळाले नाही याचे दुःख नाही पण दुसऱ्याला मिळाले म्हणून आम्हाला जळायचे नाही. त्यांना मिळाले त्यांचा मान राखायला हवा. शेतकऱ्यांच्या या स्वभावाचा विचार करायला हवा. अहो महात्मा गांधींनी दांडी यात्रा काढली. त्यावेळी त्यांनी मुठीत घेतलेले मीठ टाकले नाही. वाट्टेल तेवढा मार बसला तरी त्याला प्रतिकार केला नाही. उलट वार केला नाही. उ की चुही केले नाही. अशा या गांधी वादाचा शेतकऱ्यांवर प्रभाव आहे. कितीही अत्याचार झाला तरी तो सहन करायचा पण या सहनशक्तीचा अंत राजकर्त्यांनी पाहू नये कारण इंग्रजही देश सोडून गेले. तसे तु्म्हालाही सत्ता सोडावी लागेल प्रसंगी देशही सोडावा लागेल याचे भान त्यांनी ठेवायला हवे. शेतकरी गप्प आहे सोसतो आहे याचा अर्थ असा नव्हे की तो काहीच करणार नाही. हिसेंचा मार्ग कधीही घातक आहे. तो शेतकरी स्वीकारणार नाही. पण तुम्हाला पाय उतार करण्यासाठी योग्य मार्ग मात्र तो निश्चित स्वीकारतो याचा विचार करायला हवा. केवळ आश्वासने देऊन आता भागणार नाही. शेतकऱ्यांचे आपण काहीतरी देणे लागतो याचा विचार करुन राजकर्त्यांनी काम करायला हवे. पगारवाढ घेताना शेतकऱ्यांचा विचार आपण करायला हवा होता. ही पगारवाढ स्वीकारताना शेतकऱ्यास विसरू नका ऐवढेच येथे मला सांगावेसे वाटते.
राजेंद्र घोरपडे