Sunday, November 4, 2018

अवधान



तरी अवधान एकवेळें दीजें । मग सर्वसुखासि पात्र होईजे ।
हे प्रतिज्ञोत्तर माझें । उघड ऐका ।। 1 ।। अध्याय 9 वा

ओवीचा अर्थ - श्री ज्ञानेश्‍वर महाराज म्हणतात, अहो श्रोते हो, तर तुम्ही एक वेळ (माझ्या बोलण्याकडे) लक्ष द्या म्हणजे मग सर्व सुखाला प्राप्त व्हाल हें माझें उघड प्रतिज्ञेचें बोलणें ऐका.

साधना करायला हवी. गुरूंनी दिलेला मंत्र जपायला हवा. पण प्रत्यक्षात आपण ते करतो का? हा प्रश्‍न स्वतःच स्वतःच्या मनाला विचारावा. बऱ्याचदा याचे उत्तर नाही असेच येते. आपण साधनेला बसतो पण मन साधनेत नसते. साधना म्हणजे अवघड काम. हे आपणाला शक्‍य नाही. अध्यात्माचा मार्ग म्हणजे खडतर तपश्‍चर्या. असे काहीतरी नको ते विचार आपल्या मनात सातत्याने घोळत असतात. कारण आपणाला एक मिनिटही शांत बसून राहाता येत नाही. आता तर मोबाईल, इंटरनेट, टीव्ही यांनी तर आपल्या विचारांना अधिकच प्रोत्साहन दिले आहे. जरासा जरी फोनचा आवाज झाला तर कोणाचा मेसेज आहे हे पाहण्याकडे आपण पटकन धावतो. झोपेत असतानाही मेसेच आला तरी जागे होऊन तो पाहतो. इतके आपले जीवन त्याच्या आहारी गेले आहे. साधनेकडे मात्र पाहायला आपणाला वेळही नाही. साधना काय आहे? हेच आपण विसरलो आहोत. यामुळेच साधना आपणास अवघड वाटू लागली आहे. पण प्रत्यक्षात तर साधना अहोरात्र सुरू असते. सोऽ हम चा जप सुरूच असतो. कारण प्रत्येक श्‍वास हा सो ऽ हमचा स्वर आहे. श्‍वास हाच सोऽहम मंत्र आहे. त्याच्यात काहीच खंड पडत नाही. सतत तो सुरू असतो. साधना तर सुरू असते. मग आपणाला काय करायचे आहे? हेच तर जाणून घ्यायला हवे. प्रत्येक श्‍वासात सोऽहम, सोऽहम, सोऽहम असा हा स्वर, नाद सुरू असतो. तो स्वर, नाद आपण पकडायचा आहे. त्यावर नियंत्रण मिळवायचे आहे. तो स्वर आपण आपल्या कानांनी ऐकायचा आहे. त्या स्वरामध्येच आपण डुंबून जायचे आहे. हीच तर साधना आहे. पण असे होत नाही. मनात हजार विचार घोळत असतात. आज हे करायचे आहे. आज असे झाले पाहिजे. तसे झाले पाहिजे. भूत, भविष्यांने आपला वर्तमानही त्याच विचारात गुंतलेला असतो. आपण साधनेला बसलेले असतो. श्‍वास, जप मात्र सुरू असतो. कृतीत साधना असते. पण मनात साधना नसते. मनातील विचारात साधना आणायला हवी. विचारात आली की आपोआपच आचरणात येईल. यासाठी अवधान द्यायला हवे. सतत सुरू असलेल्या त्या स्वरावर लक्ष केंद्रित करायला हवे. तो स्वर शरीराने म्हणजे कानाने, मनाने, अंतःकरणाने ऐकायला हवा. तरच खरी साधना होते. अन्यथा साधना तर सुरूच असते. पण त्याला साधना म्हणत नाहीत. यासाठीच अवधानाला महत्त्व आहे. हे अवधान ढळता कामा नये. हे अवधान प्रत्येक शिष्याने जपायला हवे. हे ज्याला जमले. त्या शिष्याला सर्वसुखे प्राप्त होतात. आत्मज्ञानाचे सुख त्याला प्राप्त होते. ती अनुभूती त्याला येते. त्याच्या शरीरात, मनात, आचारात, विचारात तसा फरक दिसू लागतो. त्यांचे जीवन अमरत्वाला पोहोचते. यासाठी फक्त अवधान असायला हवे.

No comments:

Post a Comment