Tuesday, October 30, 2018

योगायोग


ना तरी जांभया पसरे मुख । तेथें अवचटें पडे पीयूख ।
तैसा संग्रामु हा देख । पातला असे ।। 195 ।।

आळस आला म्हणून तोंड उघडले पण त्याचवेळी तोंडात अमृत पडले. किती हा योगायोग? हा योग जुळून यावा लागतो. तो सहजपणे आला आहे. आत्मज्ञानासाठीची ही लढाईही अशीच योगायोगाने आली आहे. सद्‌गुरू भेटीसाठी धावा करावा लागतो. भगवंताची आठवण सदैव राहावी यासाठी सतत दुःखे मागणारेही भक्त येथे आहेत. पण आपणास सद्‌गुरु सहजपणे भेटले आहेत. भक्तीच्या या वाटेवर आपण कसे आलो याचा अभ्यास आपण करायला हवा. कशी याची गोडी लागली? कसे आपण यात रमलो? कसे यातून आपले जीवन सुकर झाले? दुःखाच्या क्षणातही या मार्गावरील काटे कधी पायाला टोचले नाहीत. कधीही आपले मन खचले नाही. ताठपणे उभे राहण्याचे सामर्थ्य या मार्गाने दिले. मनाला मोहात टाकणाऱ्या अनेक घटना घडत राहिल्या, पण त्यातून आपण कसे सावरत गेलो. हे कसे घडले? मनोधैर्य देणारी ही शक्ती आहे तरी कशी? हे जाणू घेण्याचा हा योग आहे. हा केवळ योगायोग आहे. जगात नवेनवे शोध दररोज लागत आहेत. शोधाचा वेग वाढतच चालला आहे. जग आता आपणास जवळ वाटत आहे. सातासमुद्रापारची माहितीही आता क्षणात घर बसल्या सहजपणे उपलब्ध होऊ शकते. जगही आपणास आता लहान वाटू लागले आहे. त्यामुळे आता इतर ग्रहावर मानव डोकावू लागला आहे. सूर्य मालेतील विविध गृह-तारेही त्याने शोधले आहेत. दररोज नवा शोध समोर येतो आहे. पण याला काही मर्यादा आहेत. हे जेव्हा तो जाणतो तेव्हा तो स्वतःचा शोध घेण्यामागे लागतो. मी कोण आहे? हे शोधण्याची त्याला आठवण होते. तो पर्यंत तो सर्वत्र भटकत राहातो. तिन्ही लोकांमध्येही त्याला रस वाटत नाही. तो जेव्हा कंटाळतो, तेव्हा आळसाच्याक्षणीही त्याला संजीवनी अगदी सहजपणे मिळते. त्याने तो तृप्त होतो. भीती पोटी कोणताही भक्त आत्मज्ञानाच्या वाटेवर येत नाही. दुःख झाले म्हणून तो येथे येत नाही. या वाटेवर येण्याचे ते एक निमित्त असते. अनायासे तो या मार्गावर येतो. मन बळकट करणारा हा मार्ग आहे. मनाला धीर देणारा हा मार्ग आहे. पण या मार्गावर आपण सहजपणे आलो आहोत. जीवनाची ही वाट सहजपणे आपणास पार करायची आहे. जीवनाच्या या प्रवासात विविध उद्योग आपण करत असतो. यात प्रत्येकवेळी आपणास नफा होईल असे नाही. कितीही मोठा उद्योजक असला तरी नुकसानीचे चटके त्याला सोसावेच लागतात. म्हणून खचायचे नसते. नुकसान का झाले, यावर उपाय योजायचे असतात. बळकट मनाने त्याला सामोरे जायचे असते. भरपूर मिळाले म्हणूनही हर्ष करायचा नसतो. सुख-दुःखात मनाला स्थिर ठेवायचे असते. आत्मज्ञानाच्या या लढाईत स्थिरतेला अधिक महत्त्व आहे. तरच ही लढाई जिंकता येते. अनायासे आपण ही लढाई लढत आहोत. तेव्हा मनाची स्थिरता ही कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करायला हवेत.


No comments:

Post a Comment