Sunday, May 3, 2015

अभ्यास

म्हणोनि अभ्यासासि कांही । सर्वथा दुष्कर नाहीं ।
यालागीं माझां ठायीं । अभ्यासें मिळ ।। 113।। अध्याय 12 वा 


अध्यात्माचा अभ्यास हा सुद्धा एक भक्तीचा प्रकार आहे. साधना करायला जमत नाही. मन साधनेत रमत नाही. काही हरकत नाही. त्यात निराश होण्याचे काहीच कारण नाही. आत्मज्ञान प्राप्तीचे अनेक मार्ग आहेत. योगाचा मार्ग कठीण आहे. शरीराला यामुळे यातना होतात. त्यासहन कराव्या लागतात. अशाने कधीकधी दुःखच पदरी पडते. मग अशा कठीण मार्गाने जाच कशाला? आत्मज्ञान प्राप्तीचे अनेक सोपे मार्ग आहेत. साधना हा सुद्धा सोपाच मार्ग आहे. पण सध्याच्या बदलत्या काळात साधना करायला ही वेळ नाही. चोवीस तास काहींना काही तरी मनात सुरु असते. अशाने मन शांत कसे होईल. घरात आले तर टि. व्ही. सुरु असतो. तो पाहायचे नाही म्हटले तर फोनवर व्हॉट्‌स अप, फेसबुक सुरू होते. फोन तर मिनिटा मिनिटाला वाजतो. जेवतानाही फोन वाजतो. अशाने जेवनाकडे लक्ष कमी फोनकडेच लक्ष अधिक असते. अशा या बदलत्या परिस्थितीत मनच शांत होणे कठीण आहे. या मनाला शांत करण्यासाठी साधना करायचे म्हटले तरी तो मार्ग कठीण वाटतो. कारण डोळे मिटल्यावर डोक्‍यात विचारांचा खेळ सुरू होतो. विचार थांबतच नाहीत. हे करायचे आहे. ते करायचे आहे. मग डोळे मिटून कसे चालेल. झाले साधना भंग झाली. मन शांतच होत नाही. झोपत सुद्धा विचार घोळत असतात. अशाने मानसाला आता अनेक विचार जडले आहेत. याचाही विचार करायला मानसाला वेळ नाही. इतका माणूस कार्यमग्न झाला आहे. अशा परिस्थितीत साधना कशी होणार? पण साधना होत नाही म्हणून निराश होण्याची काहीच गरज नाही. आत्मज्ञान प्राप्ती केवळ अभ्यासानेही साध्य होते. अध्यात्माचा केवळ अभ्यास करूनही आत्मज्ञान हस्तगत करता येते. ज्ञानेश्‍वरी वाचन हा सोपा मार्ग आहे. त्यात सांगितलेल्या ओव्यांचा अभ्यास करणे हा सुद्धा भक्तीचा मार्ग आहे. अध्यात्माचा अभ्यास करूनही आत्मज्ञान प्राप्ती होऊ शकते. सद्‌गुरुंची कृपा असेल तर अभ्यासानेही ज्ञान प्राप्ती होते. अभ्यासाने सद्‌गुरूंशी एकरूपता साधली तर आत्मज्ञान प्राप्ती होऊ शकते. बदलत्या काळात हा सोपा मार्ग नव्या पिढीने आत्मसात करायला हवा. 

No comments:

Post a Comment