Tuesday, November 26, 2013

अनुभव ज्ञानेश्‍वरी पुस्तक प्रस्तावना

।। ॐ ।।
विवेकाचे गाव
आदरणीय सद्‌गुरू दादा महाराज सांगवडेकर यांच्या परिवारातील ज्ञानेश्‍वरीचे
अभ्यासक माननीय राजेंद्र घोरपडे यांचे अनुभव ज्ञानेश्‍वरी हे पुस्तक वाचले. घोरपडे
हे सकाळ मध्ये उपसंपादक आहेत. पत्रकारितेच्या क्षेत्रात त्यांची भ्रमंती आहे. ते
ज्ञानेश्‍वरीचे अभ्यासक आहेत. साधक ही आहेत. माननीय रामराया सांगवडेकर याचा
सहवास त्यांना लाभला आहे. तो मौलिक आहे. आजच्या काळात ज्ञानेश्‍वरी कशी
अनुभविता येईल याविषयीचे ललित चिंतन या पुस्तकात आहे. ज्ञानेश्‍वरीतील निवडक
ओव्यांच्या आधारे केलेले हे चिंतन, छोटेखानी असले, तरी त्याला मनाने समजून
घेण्याचा अवकाश फार मोठा आहे.
हे पुस्तक विवेकाला अनुसरून आहे. गावात विवेक जागा असेल, तर सर्व प्रश्‍न
सुटतात. त्यासाठी अहंकार नाहीसा करावा लागतो. श्रमदानातून आणि विनम्रवृत्तीतून
एकी निर्माण होते. शरीराचे आणि मनाचे आरोग्य सुधारते. शरीराच्या उगाचच
कष्टविण्याचे कारक नाही. गुरुकृपेने असा विवेक प्राप्त होतो. त्यागाची भावना म्हणजे
संन्यास होय. देहातील विविध रसायनयुक्त असा देह बनतो. त्याच्यात आत्मचैतन्य
येते. हा विज्ञानाचा भाव नीट अभ्यासला पाहिजे, तरच आत्मज्ञानाचा अनुभव येतो.
आत्मज्ञानाच्या विकासासाठी मठ किंवा शिवालय असते. आज मात्र मठांमध्ये तंटे
निर्माण झाले आहेत. विविध देवालयातील विेशस्तांना आपली खुर्ची सांभाळण्याची
काळजी लागली आहे. यावर ज्ञानदेवांनी अत्यंत महत्त्वाचा उपाय सुचविला आहे.
तो म्हणजे, विवेक शक्ती वाढविणे हा होय. त्यासाठी ध्यानाची आवश्‍यकता आहे.
च्या एकाग्रतेतून ध्यानाच्या वाटा दिसू लागतात. त्यावर वाटचाल करणे एकूणच
अवघड असते. गुरुसेवेतून अशा वाटा सहज होतात. मनाचा अभ्यास नीट होतो.
साध्या-साध्या दैनंदिन जीवनातून या गोष्टी समजून घेता येतात. आजच्या सुसाट
जीवनात याची गरज आहे. ते घोरपडे यांनी परिणामकारकपणे सांगितले आहे. मनाला
अध्यात्माची गरज आहे. शरीराला आयुर्वेदाची गरज आहे. मनाला गुरुसेवा जरुरीची
आहे. शरीराला खिलाडूपणा आवश्‍यक आहे. यासाठी उत्कृष्ट कर्मे ही महत्त्वाची
आहेत. नित्यकर्म ही देवपूजा मानायला हवी. त्यासाठी प्रत्येकाला ज्ञानाचा हक्क आहे.
हे ज्ञान वारसा हक्काने क्वचित मिळते. ज्ञानातून आत्मज्ञान मिळाले, की मनाला आनंद
मिळतो. सुख क्षणिक असते. आनंद चिरंजीव असतो.

ज्ञानेश्‍वरीतील अनुभवविश्‍व समृध्द आहे. ते आजही मनास धैर्य देते. विश्‍व
म्हणजे वर्तमानातील जाणिवांचा समूह. जाणीव नेहमी वर्तमानाला पूरक असते.
विवेकाला जाणिवेची बैठक लागते. मनाला विचार करण्याची सवय जडते. असे
विचार सक्रिय असतात. यातून मानवी निर्णय चांगले ठरतात. सत्याचा आग्रह गरजेचा
ठरतो. यातून अहिंसा अनुभवता येते. स्वतःमध्ये गुण असतील तर, अहिंसेला मूल्य
प्राप्त होते. तेच देवाचे रूप असते. अध्यात्म ही सेवा आहे. सेवाभाव विश्‍व जिंकू
शकतो. गंगेचे पाणी साऱ्यांना स्वच्छ करते. त्याप्रमाणे शुद्ध मन अनेकांना स्वच्छ
करते, आपले कर्तव्य-कर्म चोख केले की, माणसाला देवपणाचा अनुभव येतो.
घोरपडे यांना समर्थाचिया पंक्तिभोजनें या ओवीत समान नागरी कायदा जाणवला.
विठ्ठलाच्या दर्शनाला वेगळी रांग नाही. त्याप्रमाणे आत्मज्ञानात वेगळी रांग नसते. ती
एक विशिष्ट दृष्टी असते.
या पुस्तकात अनेक चिंतनशील विचार आहेत. यातून ज्ञानेश्‍वरीकडे वेगळ्या
दृष्टीने बघता येते. अंतरंग शुद्ध राखणे आणि अहंतेला थारा न देणे या महत्त्वाच्या
बाबी आहेत. हे ध्यानात येण्यासाठी हे पुस्तक वाचावे. ते मन शुद्ध करील. आपणही
शुद्धीवर येऊ. संवेदनशील मनाला हे पुस्तक आवडावे. सुबोध वाक्‍ये, सुलभ निरूपण,
श्रद्धायुक्त मन या लेखातून व्यक्त होते. आजचा वर्तमान निवांत मनाने कसा जगता येईल
ते या पुस्तकातून कळते. श्रद्धेतून मिळणारी डोळस जाणीव विवेकाचा गाव निर्माण
करते. या गावात विशुद्ध मी आनंदाने राहतो. त्याच्याशी बोलायला माऊली येते.
तो जगण्यातून नवा होतो. त्याच्या आत्मज्ञानाला बहर येतो. शांतवृत्तीतून तो मनाचा
नंदादीप लावतो. देवाशी बोलताना, त्याच्या मनाला भरती येते. निष्काम कर्मातून तो
गगनभरारी घेतो. त्याच्या प्रत्येक कृतीला माऊली सोबत करते. तो तृप्त होतो. हा
अनुभव या पुस्तकातून श्रीयुत राजेंद्र घोरपडे यांनी दिला. तो त्यांनी आपल्याला प्रसाद
म्हणून वाटला. हे भाग्य ज्याला मिळेल, त्याला सारे काही मिळेल. याबद्दल श्रीयुत
घोरपडे यांचे अभिनंदन. त्यांना पुढील लेखनप्रवासासाठी शुभेच्छा.

डॉ. यशवंत पाठक,
संत ज्ञानदेव अध्यासन प्रमुख,
पुणे विद्यापीठ, गणेशखिंड,
पुणे 411007

No comments:

Post a Comment