Friday, February 11, 2011

युग

कलियुगांती कोरडी । चहुं युगांची सालें सांडी ।
तवं कृतयुगाची पेली देव्हडी । पडे पुढती ।।

आताचे युग हे कलियुग आहे असे म्हटले जाते. एक युग संपले की लगेच दुसऱ्या युगाचे फुटवे फुटू लागतात. युगामागून युगे येत राहतात. आता तंत्रज्ञानाचे युग आहे. नवनवे शोध लागत आहेत. तंत्रज्ञानाचा मोठा प्रसार होत आहे. पण या युगालाही अंत आहे. खनिजाचे साठे संपत आहेत. पर्याय शोधले जात आहेत. सौर उर्जेचा पर्याय आपण आता शोधला आहे. नवे पर्यायही शोधले जात आहेत. अणुउर्जेचाही पर्याय निवडला जात आहे. कारण भावी काळातील वीजेचा तुटवडा कसा पूर्ण करणार? यावर सर्व अवलंबून आहे. कोळसा संपला तर पुढे काय? याला उत्तर हवेच. यामुळे एक संपले की त्याला दुसरा पर्याय हा शोधावाच लागतो. त्यानुसार प्रगती करत राहावे लागते. नव्या परिस्थितीशी सामना करावा लागतो. असे बदल पुर्वीपासून होत आले आहेत. हे बदल होत राहणारच. बदल हाच निसर्गाचा नियम आहे. पण आत्मज्ञानात बदल होत नाही. अनेक नवे शोध लागतात. नवे तंत्रज्ञान येते. जुने तंत्रज्ञान मागे पडते. पण आत्मज्ञान पूर्वी होते. आताही आहे आणि यापूढेही ते राहणार आहे. परंपरेनुसार ते पुढे धावत राहणार. युगे येतात जातात. त्यानुसार ज्ञानही बदलत राहते पण आत्मज्ञान आहे तसेच राहते. त्यात बदल होत नाही. जे सत्य आहे. तेच शाश्‍वत आहे. तेच टिकते. यासाठी कायम सत्याची कास धरायला हवी. सत्याला ओळखायला शिकावे. खरे सुख समजून घ्यायला हवे. सत्य हाच खरा धर्म आहे. त्याचा अंगीकार करायला हवा. युगानुयुगे या ज्ञानाची परंपरा चालत आहे. यापुढेही ती चालत राहणार आहे.

राजेंद्र घोरपडे, 9011087406

No comments:

Post a Comment