2012 मध्येही 93 टक्के पाऊस पडला. 1971 लाही भीषण दुष्काळ पडला होता. पावसाचे सरासरी प्रमाण घटल्याने दुष्काळी परिस्थिती ओढवते. ही परिस्थिती आता नित्याची होताना दिसत आहे. दर दोन तीन वर्षांच्या अंतराने ही परिस्थिती आता येत आहे.
- राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल 8999732685
जे अवृष्टीचेनि उपद्रवें । गादलें विश्व आघवें । म्हणोनि पर्जन्येष्टी करावे ।
नाना याग ।। 221 ।। ज्ञानेश्वरी अध्याय 13 वा
ओवीचा अर्थ - पाऊस न
पडल्यामुळे अतिशय पीडा होऊन सर्व प्राणी जर्जर झाले म्हणजे त्यावर उपाय म्हणून पाऊस
पाडणारे नाना याग वगैरे अनेक यज्ञ करावेत.
निसर्गाच्या नियमाने पाऊस पडतो.
पण आता कृत्रिमरित्याही पाऊस पाडला जात आहे. यावर पुरातनकाळापासून प्रयोग केले जात
आहेत. दुष्काळी स्थितीवर मात करण्यासाठी पाऊस पाडण्याचा प्रयत्न होतो. आता तर
तंत्रज्ञान इतके पुढे गेले आहे की पाऊस थांबताही येतो. चीनमध्ये हा प्रयोग करण्यात
आला. क्रीडा स्पर्धेच्या कालावधीत पाऊस पडण्याची लक्षणे दिसल्यानंतर तेथील ढग
फवारणीकरून नष्ट करण्यात आले. इतके तंत्रज्ञान प्रगत झाले आहे. पण ही निसर्गाशी
मानसाची स्पर्धा आहे. पूर्वीच्याकाळीही ही स्पर्धा होती. विविध यज्ञ करून असे
प्रयोग केले जात होते. दुष्काळी परिस्थितीत शेतीचे मोठे नुकसान होते. शेतात लावलेली
पिके कधी वाया जातात.
तर पाऊस न पडल्याने जमिन पडीक ठेवण्याची वेळ येते. उत्पादनच
झाले नाही तर शेतकरी जगणार कसा? पाऊस न पडल्याने जनावरांना चाराही मिळणार नाही.
पाणी, चाऱ्याविना जनावरेही जगणार कशी? अशा परिस्थितीवर मात करण्यासाठी पाऊस
पाडण्याचे प्रयत्न झाले. हे योग्यच आहे. हा दुष्काळ अधूनमधून पडतोच आहे. 2009 मध्ये
केवळ 78 टक्केच पाऊस पडला. 2012 मध्येही 93 टक्के पाऊस पडला. 1971 लाही भीषण
दुष्काळ पडला होता. पावसाचे सरासरी प्रमाण घटल्याने दुष्काळी परिस्थिती ओढवते. ही
परिस्थिती आता नित्याची होताना दिसत आहे. दर दोन तीन वर्षांच्या अंतराने ही
परिस्थिती आता येत आहे. याला वाढते शहरीकरण, वाढती औद्योगिकता, घटणारे जंगलांचे
प्रमाण आदी कारणे आहेत. सर्व जगभरातच ही परिस्थिती आहे, त्यामुळे पृथ्वीच्या
तापमानातही वाढ होत आहे. पृथ्वीचे तापमान दोन अंशांनी वाढल्याचे शास्त्रज्ञ सांगत
आहेत.
या प्रश्नावर मात करण्यासाठी आता जनजागृतीची गरज आहे. शासकीय पातळीवरही
याबाबत प्रयत्न होण्याची गरज आहे. झाडे लावा, झाडे जगवा हा नुसता प्रचाराचा मुद्दा
झाला आहे. काही सामाजिक संघटना हजारो झाडे लावतात असे सांगतात. दरवर्षी उद्घाटनाचे
कार्यक्रम केले जातात. वृत्तपत्रात त्याच्या बातम्याही येतात. केवळ या
प्रसिद्धीसाठी पर्यावरण जागृती केली जाते. प्रत्यक्षात त्यांनी लावलेली झाडे जगतात
का हे सुद्धा पाहिले जात नाही. हजारो झाडे लावली, मग झाडे कमी कशी झाली? याचा विचार
कोण करत नाही. वनक्षेत्र दिवसेंदिवस घटत आहे.
दरवर्षी हजारो झाडे लावली मग वने कमी
कशी होत आहेत. खाणींच्या उत्खननांना परवानगी देताना त्यांनी किती जंगले उभारली?
कोठे उभारली? कशी उभारली याचा विचार केला जातो का? तसे होत नसेल तर मग खाणींसाठी
जंगले नष्ट होणारच. पर्यावरण संवर्धनासाठी नुसती झाडे लावण्याचा प्रचार करून काय
उपयोग? झाडे कोणती लावली जातात याचाही अभ्यास होण्याची गरज आहे. अनेक वृक्षांच्या
जाती आता दुर्मिळ होऊ लागल्या आहेत. ही झाडे जगविण्यासाठी प्रयत्न तर गरजेचे आहेतच
त्याबरोबर या वृक्षामुळे तयार होणारी जैवविविधताही जोपासणे गरजेचे आहे. वनांचे
संवर्धन झाले तरच पर्जन्याचे प्रमाण राखता येईल. दुष्काळ का पडतो? याचा विचार झाला
नाही तर दुष्काळाचा सामना कसा करता येईल बरे.
पूर्वी उन्हाळ्यात 35 ते 38
अंशापर्यंत असणारे तापमान आता 40 अंशाच्या पुढे गेले आहे. वाढत्या शहरीकरणावर
यासाठीच उपाय योजायला हवेत. सिमंटची जंगले उभारताना वनराई तिथे कशी उभी करता येईल
याचा विचार करायला हवा. नैसर्गिक टेकड्यातर आता शहरात दिसेनाशा झाल्या आहेत. टेकडी
नष्ट करून तेथे सपाटीकरण करून सिमेंटचे जंगल उभारले जात आहे. पूर्वी या
टेकड्यांमुळे वाहणारा वारा तटत होता. या टेकड्यांमुळे वाऱ्याचा वेग कमी केला जात
होता. या टेकडीवर असणाऱ्या थंड वातावरणामुळे या परिसरात पाऊसाचे प्रमाणही अधिक
होते. आता वाऱ्याचा वेग कमी करण्यासाठी मोठ्या इमारती उभ्या राहिल्या आहेत. पण
टेकडीसारखे कार्य त्यांच्याकडून होत नाही. जरी पाऊस पडला तरी पडणाऱ्या पावसाचे पाणी
जमिनीत मुरत नाही. कारण तेथे जमिनीत पाणी मुरण्यासाठी जागाच नाही.
भूजलपातळीही
यामुळे खालावली आहे. अशा अनेक कारणांमुळेच तापमान वाढत आहे. कोकणात तर फारच भयाण
परिस्थिती आहे. खाणींच्या उत्खननामुळे परिसरातील पाणी पिण्यायोग्यही राहिलेले नाही.
दरवर्षी सरासरी इतका पाऊस पडूनही येथे उन्हाळ्यात पाणी टंचाई जाणवतेच. पाण्याच्या
प्रदूषणाने येथे रोगराई पसरत आहे. याला जबाबदार कोण? मानवच याला जबाबदार आहे.
माणसाची हावच याला कारणीभूत आहे. अवृष्टीला जबाबदार मानवच आहे. मानवाने यासाठी आता
वेळीच जागे व्हायला हवे. अवृष्टीची समस्या भेडसावणार नाही याची काळजी घ्यायला हवी.
35 टक्के वनक्षेत्र उभे राहिले तरच पावसाचे प्रमाण टिकून राहील. वन टिकवायचे असेल
तर तसे कायदे करावे लागतील.
केवळ कायदे करून चालणार नाही, तर वनांचे संवर्धन हे
शास्त्रोक्त पद्धतीने व्हायला हवे. वनराईची जैवविविधताही जोपासण्याचा प्रयत्न
व्हायला हवा. दुर्मिळ होऊ लागलेल्या वनौषधींची लागवडही होणे गरजेचे आहे.
रसायनांच्या फवारण्याकरून कृत्रिम पाऊस पाडता येईल. पण तो एकदा-दोनदा पाडता येणे
शक्य होईल. अशा पाऊस पाडण्यासाठी करोडोंचा खर्च करावा लागणार आहे. पाऊस
पाडण्यासाठी इतका खर्च करण्याऐवजी आत्तापासूनच जंगलांच्या संवर्धनावर हा खर्च झाला
तर ही वेळ येणार नाही. पर्जन्ययाग करून कमी खर्चात पाऊस पाडणेही शक्य आहे. पण
नेहमीच असे यज्ञ करणे शक्य नाही. पाऊस पाडण्यासाठी वातावरणात तशी स्थितीही असणे
आवश्यक असते. तरच हा पाऊस पडू शकतो. ती परिस्थिती निर्माण करण्यासाठी तरी वनांची
गरज भासणार आहे. वने उभारण्याचाच संकल्प आता करायला हवा.
वड, पिंपळ, शिसव, करंज असे
मोठे मोठे वृक्ष लावून शाश्वत वृक्षांची जोपासना करायला हवी. पावसासाठी तोच खरा
मोठा यज्ञ आहे. अवृष्टीने नेहमीच त्रस्त असणाऱ्या भागात आता वने उभारायला हवीत.
दुष्काळग्रस्त भागात बाभळीची झाडे होती. आता ती दिसेनाशी झाली आहेत. पूर्वीचे
काटेरी वृक्ष आता कमी होऊ लागले आहेत. ही नष्ट होत चाललेली वनसंपदा जोपासायला हवी.
दुष्काळी भागात असे वृक्ष मोठ्या प्रमाणात पाहायला मिळायचे. पण बागायती शेतीमुळे
बाभळी नष्ट झाल्या. पण आता पाऊसही घटल्याने बागायतीही नष्ट होऊ लागली आहे. चला आता
एक वृक्ष नव्हे एक वनच उभारू. एका वृक्षाने आता भागणारे नाही. जंगलच उभे करावे
लागेल.
। । ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।।
आपणाला आम्ही केलेले निरुपण आवडत असेल तर नियमित वाचण्यासाठी डेलिहंटवर `इये मराठीचिये नगरी` याला फाॅलो करायला विसरू नये. |
श्री ज्ञानेश्वरी निरूपण..एकतरी ओवी अनुभवावी... ज्ञानेश्वरी चिंतन मनन अध्ययन यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन होण्यासाठी http://t.me/Dnyneshwari येथे क्लिक करा.
राजेंद्र कृष्णराव घोरपडे लिखित अध्यात्मावरील पुस्तके इये मराठीचिये नगरी किंमत - 80 रुपये, कृषि ज्ञानेश्वरी - 100 रुपये अनुभव ज्ञानेश्वरी - 100 रुपये
या पुस्तकांसाठी करा संपर्क - मोबाईल - 8237857621 #Spiritual #आध्यात्मिक #ज्ञानेश्वरी #Dnyneshwari #RajendraGhorpade #राजेंद्रघोरपडे |
|
No comments:
Post a Comment