Monday, January 13, 2020

नास्तिकवाद




नास्तिकांना आस्तिक करणे अवघड आहे, पण त्यांच्यातील नास्तिकता न स्वीकारने, हे तर आपल्याच हातात आहे यावर एकमत व्हायला हवे. आपोआप बदल होईल.

तरी माशालागीं भुलला । ब्राह्मण पाणबुडां रिघाला ।
कीं तेथही पावला । नास्तिकवादु ।। 451 ।। अध्याय 16 वा

ओवीचा अर्थ - तरी माशांच्या लोभानें ब्राह्मण कोळ्यांच्या जातीत शिरला. तों त्या कोळ्यांच्या जातींतही त्याला, असला नास्तिक आम्हांला नको म्हणून घेईनात. याप्रमाणें तो आपल्या जातीस व परक्‍या जातीसही मुकला.

नास्तिक, मग तो कोणत्याही जातीतील असो, शेवटी तो नास्तिकच असतो. पापीच असतो. एखाद्या नास्तिकाने धनाच्या, संपत्तीच्या मोहाने परजातीचा स्वीकार केला, तरी त्या जातीतील लोक त्याचा स्वीकार करतीलच असे नाही. कारण जात बदलल्याने त्याचे नास्तिकपण धुतले जात नाही. त्याने केलेली पापे धुतली जात नाहीत. जागतिकीकरणाने जातीय व्यवस्थेला फारसे महत्त्व राहिलेले नाही. जातपात आता मानली जात नाही, पण सध्याच्या युगात जातीय व्यवस्थेला उच्च - नीच या भेदभावांनी घेरलेले होते. यामुळे जातीय व्यवस्थेचा मूळ उद्देशच नष्ट झाला होता. आपल्या देशात समाजात एकोपा नांदावा, सुख, शांती नांदावी या उद्देशाने जातीय व्यवस्थेची रचना करण्यात आली. यामध्ये उच्च - नीच असा भेदभाव कधीही नव्हता, पण काळाच्या ओघात काही स्वार्थी राजकीय मंडळींनी स्वतःच्या स्वार्थासाठी हा भेदभाव निर्माण केला. पैशाच्या लोभाने, लालसेने, स्वार्थी वृत्तीमुळे हा वाद, भेदभाव निर्माण केला. जातीय व्यवस्थाही मुळात सर्वांना समान हक्क देणारी आहे. सर्वांना त्यामध्ये समान वागणूक दिली जात होती. शांतता नांदावी हा मुख्य उद्देश त्यामध्ये होता, पण स्वार्थामुळे हा उद्देशच नष्ट केला गेला. मूळ रचनेत भेदभाव नाही. शांतीसाठी उभारलेल्या गोष्टीमध्ये अशांती कशी असेल ! स्वार्थी मंडळींनी ही अशांती घुसडली आहे, पण आता काळ खूपच पुढे गेला आहे. सध्याच्या काळात वाद निर्माण करणारे हेच आहेत आणि वाट मिटवणारेही हेच आहेत. यामुळेच सत्तेत वारंवार बदल होत आहेत. एखादे नाटक फार काळ टिकत नाही. त्याचाही कालावधी असतो. स्थिर सरकार ही कल्पनाही आता मागे पडली आहे. देशात स्थिर सरकार नांदावे असे वाटत असेल, तर स्वार्थी राज्यकर्त्यांची ही फळी मोडून काढायला हवी, पण याविरुद्ध आवाज कोण उठवणार ? माणसांना सुधारण्याचा कितीही प्रयत्न केला तरी माणसे सुधारतील, याची शाश्‍वती देता येत नाही. काही जण सुधारतातही. सर्वच बदलतात, असे होत नाही. मग नेमके याविरुद्ध लढणार कसे? नास्तिकांना आस्तिक करणे अवघड आहे, पण त्यांच्यातील नास्तिकता न स्वीकारने, हे तर आपल्याच हातात आहे यावर एकमत व्हायला हवे. आपोआप बदल होईल.

।। ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।।



No comments:

Post a Comment