Wednesday, November 7, 2018

स्वरुप



ना तरी मठीं आकाश जैसें । मठाकृती अवतरलें असे ।
तो भंगलिया आपैसे । स्वरुपचि ।। 142 ।। अध्याय 2 रा

ओवीचा अर्थ - ज्या प्रमाणे आकाश हें मठात मठाच्या आकाराचें झालेले दिसते पण तो मठ मोडल्यावर तें आकाश सहजच आपल्या मूळ रूपाने राहाते.

स्वतःचे रुप कसे आहे. कोण काळा असतो. कोण गोरा असतो. कोणी सावळे असते. हे बाह्यरुप आहे. बाह्यरुपात कोणी सुंदर असते तर कोण दिसायला कुरुप असते. पण हे रुप आहे ते देहाचे आहे. हा आकार अनुवंशीक रचनेनुसार ठरतो. विज्ञानाने आता सुंदर मुलांचीही निर्मिती केली जात आहे. अनुवंशीक रचनेत योग्य ते बदल करून आकार बदलता येऊ शकतो. रंग बदलला जाऊ शकतो. धान्याच्याही अशाच पद्धतीने जाती विकसित केल्या जात आहेत. उत्पादन वाढीचे जनुक घालून त्यांचे उत्पादन वाढविले जात आहे. विविध कीड रोगांना प्रतिकार करण्याची क्षमता उत्पन्न केली जात आहे. पण या नव्या जाती फारश्‍या टिकावू नसतात. सुरवातीच्या दोन तीन पिढ्यांमध्ये या जाती उत्तम उत्पादन देतात. त्यानंतर मात्र त्यांची गुणवत्ता राहात नाही. यावरुन मानवांमध्ये केले जात असलेल्या बदलावरही असाच परिणाम दिसणार, हे निश्‍चित आहे. पण तरीही असे प्रयोग केले जात आहेत. भावी काळात नऊ महिने गर्भाशयात जीव वाढविण्याचे प्रकारही बंद होतील. असे तंत्रज्ञान विकसित झाले आहे. पण याचे दुःष्परिणामही विचारात घ्यायला हवेत. सध्या दुःष्परिणामांचा विचारच केला जात नसल्याने अनेक गंभीर समस्या उभ्या राहण्याची शक्‍यता आहे. केवळ सध्यस्थितीचाच विचार केला जात आहे. सध्या फायदा मिळतो ना. मग पुढचा विचारच होत नाही. अशा दुरदृष्टीच्या अभावानेच सर्वत्र गंभीर समस्या उभ्या राहात आहेत. तापमानवाढ असो किंवा पर्यावरणाचा ह्यास असो किंवा सध्या विकसित होत असलेले नवे तंत्रज्ञान असो. केवळ त्यामध्ये वरवरचा व सध्यस्थितीचाच विचार दिसून येत आहे. बाह्यरंगालावरच सर्व भुलले जात आहेत. अंतरंगात डोकावण्याचा कोणी विचारच करत नाही. अशामुळेच खरे स्वरुप प्रकट होत नाही. खरे स्वरुप हे अंतरंगात सामावलेले आहे. पाण्याने भरलेल्या मठात आकाश दिसते. आपण सध्या मठातील आकाशच पाहात आहोत. पण हे आकाश खरे नाही. हा मठ फुटल्यानंतरच खरे त्याचे स्वरुप स्पष्ट होते. मठ म्हणजे देह आहे. आपण देहालाच खरे स्वरुप समजू लागलो आहोत. बाह्यरुपालाच खरे स्वरुप समजत आहोत. पण हे खरे स्वरुप नाही. मानवाचे खरे स्वरुप हे आत्मा आहे. या देहाच्या अंतरंगामध्ये असणारा आत्मा हेच मानवाचे खरे स्वरुप आहे. पण त्याकडे पाहण्यास आपणास वेळच नाही. मठ जसा फुटल्यावर आकाशाचे खरे रुप समजते, तसे हा देह संपल्यानंतरच आपणास त्याची प्रचिती येते. देहात आहे तोपर्यंत त्याची माहिती घेण्याची आपण तस्तीही घेत नाही. त्यामुळे आपले खरे स्वरुप आपणास समजत नाही.


No comments:

Post a Comment