Wednesday, September 17, 2014

सुख - निद्रा

सांग विस्तवाचे । अंथरुणावरी । लागेल का तरी । सुख-निद्रा ।। 946 ।।
स्वामी स्वरूपानंद अभंग ज्ञानेश्‍वरी अध्याय 9 वा

आपल्या नावडत्या गोष्टींनी आपले मन विचलित होते. पण आवडत्या गोष्टींनीही आता मन विचलित होऊ लागले आहे. बदलती संस्कृती, वॉट्‌सअँप, स्मार्टफोनच्या जमान्यात साधा फोन जरी आला नाही, संवाद झाला नाही, पोस्ट टाकली नाही, कोणी लाईक केले नाही यामुळेही बेचैनी वाटू लागते. सारा वेळ यामध्येच जाऊ लागला आहे. संवाद आता कृत्रिम झाला आहे. विचार शांत होण्याऐवजी तो वेगाने वाढतच आहे. अशाने मनाची शांतीच नष्ट झाली आहे. विस्तवाच्या अंथरूणावर झोपण्याचा प्रयत्न केल्यास झोप कशी लागणार? पण आता नव्या जमान्यात या विस्तवाच्या अंथरुणावरच झोपावे लागणार आहे, अशी परिस्थिती आहे. त्याची सवय आता करावी लागणार आहे. बदलत्या परिस्थितीत कसे वागायचे, हे अध्यात्म शिकवते. काळ बदलला आहे. या परिस्थितीत मनाचा समतोल ढळू देऊ नये. कोणी पोस्ट टाकली नाही, कोणी आपला विचार केला नाही, कोणी बोलले नाही म्हणून नाराज होण्याची गरज नाही. मनाचा समतोल ढळू न देणे हेच अध्यात्म शिकवते. मन शांत ठेवावे, मनातील विचार शांत व्हावेत. यासाठी प्रयत्न करायला हवेत. यासाठीच साधना आहे. साधनेने हे साध्य होते. पण साधनेतही मन रमत नाही. विचार राहात नाहीत. साधना करतानाही मोबाईलची रिंगटोन वाजते. कोणाचा मेसेज असेल या उत्सुकतेने आपण त्याकडे वळतो. इतकी सवय या मोबाईलची झाली आहे. रटाळ मेसेज असेल तर मन भडकून उठते. आता ठरवायचे साधनेच्या वेळेत फोन कडे लक्ष द्यायचे नाही. थोडावेळ तरी शांत बसता आले तरी आपण नियंत्रण मिळविण्यात यशस्वी होऊ. पण निर्णयच घेतला नाही, मोबाईल मागे धावतच सुटलो तर मग शांती कशी मिळेल. मोबाईल ही सुख वस्तू आहे. त्यापासून सुख घ्यायला हवे. पण मनाची शांती विचलित करून दुःख देत असेल तर त्यातील सुख कसे मिळवता येईल याचा विचार करायला हवा. सुखाच्या वस्तूतून समाधान घ्यायला शिकले पाहिजे. सुख-दुःखाचा विचार करत न बसता मनाला या विस्तवावर झोप लागेल याकडे लक्ष द्यायला हवे. तशी सवय अंगी लावायला हवी. बदलते जग वेगाने बदलत आहे. हा वेग पकडण्याच्या मागे आपण लागलो आहोत, पण सुखाने त्याचा वेग पकडायला हवा. दुःख गिळायला शिकले पाहिजे. तितके सामर्थ्यवान आपण व्हायला हवे. सुख-दुःख पचविण्यासाठी साधनेची गरज आहे. शांतीची गरज आहे. मनाला ही सवय लावायला हवी. तरच मनशांती भेटेल.

Tuesday, September 9, 2014

समर्पण

म्हणोनि उचित । कर्मे ती आघवीं । मज समर्पावी । आचरोनि ।।311।।
स्वामी स्वरुपानंद अभंग ज्ञानेश्‍वरी

प्रत्येक धार्मिक ग्रंथाच्या शेवटी ते पुस्तक सद्‌गुरुंना अर्पण केल्याचा उल्लेख असतो. तशी ही परंपरा आहे. प्रत्येक कर्म हे सद्‌गुरुंना अर्पण करावे, असा नियमच आहे. म्हणूनच तसे कसे केले जाते. पुस्तक लिहिले गेले, विचार मांडले गेले ते सद्‌गुरुंच्या कृपेमुळे सुचले. नव्हेतर ते सद्‌गुरुंनीच सुचविले असा भाव त्यामध्ये असतो. सद्‌गुरुंच्या भावातून जे प्रगटले. ते स्वतःचे आहे असे कसे म्हणता येईल. ते सद्‌गुरुंचेच आहे. सद्‌गुरुंना समक्ष भेटून जरी ते अर्पण करता आले नाही, तरी तो भाव मनात कायम असणे म्हणजे ते सद्‌गुरुंना समर्पित करण्यासारखेच आहे. समर्पण म्हणजे शरणांगती. शत्रू समोर पत्करलेली शरणांगती आणि सद्‌गुरूंच्या समोरील शरणांगती यामध्ये फरक आहे. याची गल्लत करु नये. शरण जाणे म्हणजे सर्वस्व घालविणे अशी मनाची दुर्बलता करून घेणे चुकीचे आहे. सद्‌गुरूंना शरण जाणे म्हणजे मन दुबळे होते. विचार दुबळे होतात असा अर्थ लावणे चुकीचे आहे. तसा विचार करणेही चुकीचे आहे. अध्यात्मात तसा त्याचा अर्थ नाही हे समजून घ्यायला हवे. सद्‌गुरु हे शत्रू नाहीत. मित्र आहेत. सहकारी आहेत. अशा थोर व्यक्तीच्या चरणी शरण जाणे हे सहजरित्या घडत नाही. याला काहीतरी अनुभव यावा लागतो. तरच हे घडते. देवाची आठवण ही कठीण प्रसंगी चटकण होते. इतर वेळी ही आठवण होईलच असे नाही. शरण जाणे आणि पराभूत होणे यामध्ये फरक आहे. शरण जाणे हा पराभव नाही. सद्‌गुरूंच्या अनुभवामुळे ही शरणांगती येते. जे पुस्तक आपण लिहीले ते विचार त्यांचे होते हा अनुभव जेव्हा येईल. तेव्हा ते पुस्तक त्यांचे आहे. त्यांनाच समर्पित करायला हवे. असा भाव सहजच मनात प्रगट होते. म्हणूनच धार्मिक पुस्तके ही सद्‌गुरुंना, भगवंताना अर्पण केलेली असतात. संशोधनाचे प्रबंध हे गुरुंना समर्पित करावेत. कारण ते गुरुंच्या कृपेमुळे त्यांच्या सहकार्यामुळेच ते पूर्ण झाले असतात. त्यांनीच तर ते शिकविले आहे. अशा गुरुंना तो प्रबंध समर्पित करायला हवा. अध्यात्म गुरु आणि प्रत्यक्ष शिक्षण देणारे गुरु यामध्ये फरक आहे. पण शेवटी ते गुरुच आहेत. गुरूंचा मान हा राखायलाच हवा. गुरु हे ज्ञानाचे सागर असतात. त्यांच्यातून प्रकट होणाऱ्या ज्ञानातुनच तर शिष्याचा विकास होत असतो. यासाठी सद्‌गुरुंना समर्पण करण्याचा भाव सदैव मनामध्ये असावा. हा भाव कायम राहीला तर मीपणाची भावनाच राहणार नाही. अशा भावामुळेच आत्मज्ञानी होण्याचा मार्ग सुकर होईल.