Thursday, July 24, 2014

झुंज

म्हणोनियां देवा। जळो जळो झुंज । माने ना हें मज। कांही केल्या ।। 335 ।।
स्वामी स्वरुपानंद अभंग ज्ञानेश्‍वरी

ही झुंज कोणाशी आहे ? स्वतःच स्वतःशी ही झुंज आहे. पण मी पणामुळे ही झुंज नकोशी झाली आहे. हे माझं आहे? ते माझं आहे? या मोहाने लढण्याची इच्छाच नष्ट होऊ लागली आहे. धकाधकीच्या जीवनात साधना करायला वेळच नाही. एक-एक मिनिट मोलाचा झाला आहे. एक मिनिटात आपण साऱ्या जगभरात संदेश पोहोचवू शकतो. विकासाने इतका वेग घेतला आहे. विकासाच्या या वेगासोबत आपणाला राहावे लागणार आहे. हा वेग पकडला तरच उज्ज्वल भवितव्य घडणार आहे. हा वेग पकडण्यातच सगळा वेळ जात आहे. दैनंदिन जीवनात थांबायलाही वेळ नाही. अशी स्थिती उत्पन्न झाली आहे. अशावेळी साधनेसाठी वेळ कसा देता येऊ शकेल. आत्मज्ञानाच्या प्राप्तीसाठी झुंज देण्यास वेळच नाही. दररोजच्या रोजी-रोटीचा प्रश्‍न गंभीर झाला आहे. अशावेळी आत्मज्ञानाचा विचार कसा येईल. ताज्या घडामोडीतच सगळा वेळ जात आहे. विश्रांती म्हणून फिरायला गेले तरीही तेथेही तेच सुरू होते. मोबाईल फोनमुळे सारे जीवनच व्यस्त झाले आहे. रेल्वेतून जाताना खिडकीतून डोकावायलाही वेळ नाही. निसर्गाचा स्वाद घेऊन मन मोकळे करायलाही वेळ नाही. जेवतानाही टिव्हीत डोकावतच जेवन होते. जेवनही त्याच विचारात होते. अशा धकाधकीच्या जीवनात साधनेचा विचार कसा येऊ शकेल. इतके व्यस्त जीवन झाले आहे. आत्मज्ञानासाठी झुंजण्याचा विचारच नकोसा झाला आहे. आत्मज्ञानी होऊन करायचे तरी काय? तिन्ही जगाचे ज्ञान घेऊन काय मिळवायचे? यापेक्षा नको ते आत्मज्ञान रोजचे जीवन धकाधकीचे असले तरी सुंदर आहे. सुखी आहे. या मोहाने आता आपण ग्रस्त झालो आहोत. जीवनाचा खरा अर्थ समजून घेण्यास आपणास वेळच नाही. समजून घेऊन तरी काय करणार? अशा विचाराने आता लढण्याचे सामर्थ्यही उरलेले नाही. अशा विचाराने आपण आत्मज्ञानी होऊ ही आशाच आता संपली आहे. अशा या ग्रस्तव्यक्तिला स्वामीनी सल्ला दिला. स्वामी म्हणाले अरे तुला कोण लढायला सांगते, फक्त निमित्त मात्र तर तुला व्हायचे आहे. लढाई तर तू लढतच आहेस. फक्त या लढाईकडे तुला लक्ष द्यायचे आहे. तु नको म्हणालास तरी ही तुझी लढाई सुरूच आहे. सुरूच राहणार आहे. फक्त तुझे अवधान हवे आहे. श्‍वासाची ही लढाई थांबली तर तुझे जीवनच संपणार आहे. फक्त सुरू असणाऱ्या या लढाईकडे अवधान दे. दिवसातील काही क्षणजरी तू दिलेस तरी तुझा विजय निश्‍चित आहे. सोऽहम, सोऽहम चा अखंड स्वर हा सुरूच आहे. तो फक्त तुला तुझा कानांनी ऐकायचा आहे. मनाने तुला तो अनुभवायचा आहे. त्या स्वरावर तुला तुझे मन नियंत्रित करायचे आहे. त्या स्वरात डुंबायला शिक. म्हणजे तुझा आत्मज्ञानावर विजय निश्‍चित आहे. या लढाईत फक्त तु निमित्त मात्र हो.

Thursday, July 17, 2014

ऊठ तूं सत्वर

आता धनुर्धरा । ऊठ तूं सत्वर । सर्वथा स्वीकार । धैर्यवृत्ती ।। 361।।
अध्याय 4 था स्वामी स्वरूपानंद अभंग ज्ञानेश्‍वरी

मोहाचा पडदा पांघरूण गाठ झोपी गेलेल्या मानवा ऊठ, जागा हो. असे आवाहन स्वामी करत आहेत. स्वामींच्या या आर्त हाकेने जागे व्हा. पूर्वी सकाळी भूपाळी गायली जायची. सकाळच्या प्रसन्न वातावरणात ही भूपाळी दिवसाची सुरवात आनंदी करायची. दिवसभरात कितीही दुःखाचे प्रसंग आले तरी या भूपाळीच्या प्रसन्नतेमुळे त्यावर मात केली जायची. आता तसे घडत नाही. सकाळी उठतो पण कामाच्या तणावाने. या ताणतणावातच सगळा दिवस जातो. झोपतानाही तोच विचार असतो. कोठेही शांतता नसते. सध्या अनेकजण ऑफिसचे काम ऑफिसात घरी आल्यावर त्यावर चर्चाही करत नाहीत. इतके कंटाळवाणे काम झाले आहे. सदैव त्याच विचाराने आपण कंटाळलो आहोत. याचा परिणाम आपल्या शरीरावरही होत आहे. रोजच्या धकाधकीच्या जीवनात मग कधी प्रवासाला जातो. भटकंती करतो. अशा पर्यटनाने थकवा दूर करावा लागतो. या क्षणिक आनंदाने ताणतणावाला थोडी उसंत मिळते खरी, पण कायमचा थकवा जात नाही. पुन्हा घरी परतले की तोच ताणतणाव, तीच धकाधकीची कामे सुरू होतात. अशा या धकाधकीचे जीवन आनंदी कसे करायचे हे सांगण्यासाठी स्वामी आपणास हाक मारत आहेत. मोहमयी जीवनातून बाहेर काढण्यासाठी त्यांची ही आर्त हाक आहे. या जीवनाला कंटाळू नकोस. हे जीवन आनंदी कर. भगवंतांनी दिलेला प्रत्येकक्षण मोलाचा आहे. तो आनंदी कर. आनंदाने त्याचा स्वीकार कर. दुःख जरी झाले. तरी ते आनंदाने स्वीकार. धैर्याने त्याला सामोरे जा. दुःखावर आनंदाने मात कर. मन आनंदी राहिले तर जीवनही आनंदी होईल. दुःखाचा विचार करत बसलास तर जीवनच दुःखी होईल. याचा विचार करून दुःखावर आनंदाने मात कर. कामाचा आनंद घेण्यास शीक. जीवनाचा प्रत्येकक्षण आनंदी करण्याचा प्रयत्न कर. म्हणजे आपले जीवनच आनंदी होईल. हा आनंद म्हणजे चंगळ नव्हे. हुल्लडबाजी नव्हे. क्षणिक आनंदाचा लाभ घेऊन जीवन पुन्हा दुःखी करू नकोस. खरा आनंद ओळख. आध्यात्मिक जीवनात दडलेला आनंद शोध. त्याचा लाभ घे. जीवनात कायमस्वरूपी आनंद नांदावा यासाठीच या मार्गाचा स्वीकार कर. हा मार्ग आहे तरी काय, हे जाणून घे. जीवनाच्या प्रत्येकक्षणी त्याचा प्रवास सुरू आहे. त्याची धडधड सुरू आहे. ती धडधड स्वतःच्या कानाने ऐक. स्वतःच्या मनाने ती अनुभव. गर्वाचा त्याग करून, अहंकाराचा नाश करून त्या अनुभवाचा आनंद घे. धैर्याने ही साधना अखंड सुरू असू दे. त्या आनंदात जीवन आनंदी कर. स्वामींचीही आर्त हा आता तरी ऐक. ऊठ तूं सत्वर जागा हो.