Tuesday, November 26, 2013

अनुभव ज्ञानेश्‍वरी पुस्तक प्रस्तावना

।। ॐ ।।
विवेकाचे गाव
आदरणीय सद्‌गुरू दादा महाराज सांगवडेकर यांच्या परिवारातील ज्ञानेश्‍वरीचे
अभ्यासक माननीय राजेंद्र घोरपडे यांचे अनुभव ज्ञानेश्‍वरी हे पुस्तक वाचले. घोरपडे
हे सकाळ मध्ये उपसंपादक आहेत. पत्रकारितेच्या क्षेत्रात त्यांची भ्रमंती आहे. ते
ज्ञानेश्‍वरीचे अभ्यासक आहेत. साधक ही आहेत. माननीय रामराया सांगवडेकर याचा
सहवास त्यांना लाभला आहे. तो मौलिक आहे. आजच्या काळात ज्ञानेश्‍वरी कशी
अनुभविता येईल याविषयीचे ललित चिंतन या पुस्तकात आहे. ज्ञानेश्‍वरीतील निवडक
ओव्यांच्या आधारे केलेले हे चिंतन, छोटेखानी असले, तरी त्याला मनाने समजून
घेण्याचा अवकाश फार मोठा आहे.
हे पुस्तक विवेकाला अनुसरून आहे. गावात विवेक जागा असेल, तर सर्व प्रश्‍न
सुटतात. त्यासाठी अहंकार नाहीसा करावा लागतो. श्रमदानातून आणि विनम्रवृत्तीतून
एकी निर्माण होते. शरीराचे आणि मनाचे आरोग्य सुधारते. शरीराच्या उगाचच
कष्टविण्याचे कारक नाही. गुरुकृपेने असा विवेक प्राप्त होतो. त्यागाची भावना म्हणजे
संन्यास होय. देहातील विविध रसायनयुक्त असा देह बनतो. त्याच्यात आत्मचैतन्य
येते. हा विज्ञानाचा भाव नीट अभ्यासला पाहिजे, तरच आत्मज्ञानाचा अनुभव येतो.
आत्मज्ञानाच्या विकासासाठी मठ किंवा शिवालय असते. आज मात्र मठांमध्ये तंटे
निर्माण झाले आहेत. विविध देवालयातील विेशस्तांना आपली खुर्ची सांभाळण्याची
काळजी लागली आहे. यावर ज्ञानदेवांनी अत्यंत महत्त्वाचा उपाय सुचविला आहे.
तो म्हणजे, विवेक शक्ती वाढविणे हा होय. त्यासाठी ध्यानाची आवश्‍यकता आहे.
च्या एकाग्रतेतून ध्यानाच्या वाटा दिसू लागतात. त्यावर वाटचाल करणे एकूणच
अवघड असते. गुरुसेवेतून अशा वाटा सहज होतात. मनाचा अभ्यास नीट होतो.
साध्या-साध्या दैनंदिन जीवनातून या गोष्टी समजून घेता येतात. आजच्या सुसाट
जीवनात याची गरज आहे. ते घोरपडे यांनी परिणामकारकपणे सांगितले आहे. मनाला
अध्यात्माची गरज आहे. शरीराला आयुर्वेदाची गरज आहे. मनाला गुरुसेवा जरुरीची
आहे. शरीराला खिलाडूपणा आवश्‍यक आहे. यासाठी उत्कृष्ट कर्मे ही महत्त्वाची
आहेत. नित्यकर्म ही देवपूजा मानायला हवी. त्यासाठी प्रत्येकाला ज्ञानाचा हक्क आहे.
हे ज्ञान वारसा हक्काने क्वचित मिळते. ज्ञानातून आत्मज्ञान मिळाले, की मनाला आनंद
मिळतो. सुख क्षणिक असते. आनंद चिरंजीव असतो.

ज्ञानेश्‍वरीतील अनुभवविश्‍व समृध्द आहे. ते आजही मनास धैर्य देते. विश्‍व
म्हणजे वर्तमानातील जाणिवांचा समूह. जाणीव नेहमी वर्तमानाला पूरक असते.
विवेकाला जाणिवेची बैठक लागते. मनाला विचार करण्याची सवय जडते. असे
विचार सक्रिय असतात. यातून मानवी निर्णय चांगले ठरतात. सत्याचा आग्रह गरजेचा
ठरतो. यातून अहिंसा अनुभवता येते. स्वतःमध्ये गुण असतील तर, अहिंसेला मूल्य
प्राप्त होते. तेच देवाचे रूप असते. अध्यात्म ही सेवा आहे. सेवाभाव विश्‍व जिंकू
शकतो. गंगेचे पाणी साऱ्यांना स्वच्छ करते. त्याप्रमाणे शुद्ध मन अनेकांना स्वच्छ
करते, आपले कर्तव्य-कर्म चोख केले की, माणसाला देवपणाचा अनुभव येतो.
घोरपडे यांना समर्थाचिया पंक्तिभोजनें या ओवीत समान नागरी कायदा जाणवला.
विठ्ठलाच्या दर्शनाला वेगळी रांग नाही. त्याप्रमाणे आत्मज्ञानात वेगळी रांग नसते. ती
एक विशिष्ट दृष्टी असते.
या पुस्तकात अनेक चिंतनशील विचार आहेत. यातून ज्ञानेश्‍वरीकडे वेगळ्या
दृष्टीने बघता येते. अंतरंग शुद्ध राखणे आणि अहंतेला थारा न देणे या महत्त्वाच्या
बाबी आहेत. हे ध्यानात येण्यासाठी हे पुस्तक वाचावे. ते मन शुद्ध करील. आपणही
शुद्धीवर येऊ. संवेदनशील मनाला हे पुस्तक आवडावे. सुबोध वाक्‍ये, सुलभ निरूपण,
श्रद्धायुक्त मन या लेखातून व्यक्त होते. आजचा वर्तमान निवांत मनाने कसा जगता येईल
ते या पुस्तकातून कळते. श्रद्धेतून मिळणारी डोळस जाणीव विवेकाचा गाव निर्माण
करते. या गावात विशुद्ध मी आनंदाने राहतो. त्याच्याशी बोलायला माऊली येते.
तो जगण्यातून नवा होतो. त्याच्या आत्मज्ञानाला बहर येतो. शांतवृत्तीतून तो मनाचा
नंदादीप लावतो. देवाशी बोलताना, त्याच्या मनाला भरती येते. निष्काम कर्मातून तो
गगनभरारी घेतो. त्याच्या प्रत्येक कृतीला माऊली सोबत करते. तो तृप्त होतो. हा
अनुभव या पुस्तकातून श्रीयुत राजेंद्र घोरपडे यांनी दिला. तो त्यांनी आपल्याला प्रसाद
म्हणून वाटला. हे भाग्य ज्याला मिळेल, त्याला सारे काही मिळेल. याबद्दल श्रीयुत
घोरपडे यांचे अभिनंदन. त्यांना पुढील लेखनप्रवासासाठी शुभेच्छा.

डॉ. यशवंत पाठक,
संत ज्ञानदेव अध्यासन प्रमुख,
पुणे विद्यापीठ, गणेशखिंड,
पुणे 411007

Monday, November 18, 2013

"अनुभव ज्ञानेश्‍वरी' पुस्तकाचे प्रकाशन

श्री अथर्व प्रकाशनच्या "अनुभव ज्ञानेश्‍वरी' या पुस्तकाचे प्रकाशन आज "सकाळ'च्या कार्यालयात सकाळचे मुख्य संपादक श्रीराम पवार, मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष उत्तम कांबळे, कोल्हापूर सकाळचे निवासी संपादक मनोज साळुंखे, संजय पाटोळे, सुधाकर काशिद, चंद्रशेखर माताडे यांच्या हस्ते झाले. 
 

Thursday, November 14, 2013

"अनुभव ज्ञानेश्‍वरी' येत आहे 17 नोव्हेबरला

इये मराठीचिये नगरी या माझ्या पहिल्या पुस्तकाला वाचकांनी चांगली पसंती दर्शिवली यामुळेच अशी पुस्तके पुन्हा वाचकांच्या भेटीला द्यावीत अशी प्रेरणा मला मिळाली. पहिल्या पुस्तकाला मिळालेला प्रतिसाद पाहता ज्ञानेश्‍वरीवर आधारित पुस्तकांची मालिकाच करण्याचा मी संकल्प केला आहे. विविध विषय घेऊन ज्ञानेश्‍वरीच्या ओव्या पुस्तके घेऊन आपल्या भेटीला येत राहणार आहे.
इये मराठीचिये नगरी हे पुस्तक वाचून अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या.
नागपूरचे चेतन अकर्ते यांनी या पुस्तकांचे मोबाईल ईबुक करण्याची संकल्पना मांडली, तसे ते त्यांनी ताबडतोब केलेही. हजारो मोबाईलधारकांनी हे पुस्तक मोबाईलमध्ये डाऊनलोड केले आहे. त्याच्या या कार्याबद्दल त्यांचे उपकार कसे मानावेत हेच समजत नाही. हिंगोली परिसरातील कीर्तनकार माऊली विधाते यांनी ह्या पुस्तकांतील उदाहरणे कीर्तनात सांगण्याची परवानगी मागितली. पंकज पाटील, सचिन गावरी, रविंद्र फासे, साई हिवराळे, श्रावण पवार आदींनी ईबुकवर प्रतिक्रियाही नोंदवली. पल्लवी निंबाळकर यांनी कॅलिफोर्निया येथून फोनवर संपर्क साधून पुस्तकाबद्दल प्रतिक्रिया व्यक्त केली. अशी अनेकांनी पुस्तकाची स्तुती केली. आपल्या या आर्शीवादानेच अनुभव ज्ञानेश्‍वरी हे पुस्तक लिहिण्यास उत्साह वाढला. अनुभव ज्ञानेश्‍वरी या पुस्तकानंतर आता ज्ञानेश्‍वरीतील शेतीविषयक ओव्या घेऊन कृषी ज्ञानेश्‍वरी लिहिण्याचा प्रयत्न असणार आहे. वाचकांचा प्रतिसाद मिळत राहिला तर लिहिणाऱ्याला स्फुरण चढते. ज्ञानेश्‍वरी स्वतः अभ्यासत इतरांनाही त्यातील प्रसाद मिळावा या उद्देशाने ही सेवा सुरू आहे.
ज्ञानेश्‍वरीचे वाचन करताना जे काही स्फुरले, मनाला भावले, जे काही अनुभवले तेच या अनुभव ज्ञानेश्‍वरी या पुस्तकाच्या माध्यमातून वाचकांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे. ज्ञानेश्‍वरी हा अनुभवण्याचा ग्रंथ आहे. त्यातील एखादी तरी ओवी अभ्यासावी त्यानुसार आचरण करण्याचा प्रयत्न करावा. ती ओवी अनुभवण्याचा प्रयत्न करावा. हळूहळू ओव्यांचे अनुभव आपोआपच आपल्या मनाला साद घालतात.
आवड आपोआपच लागते. हळूहळू आपल्याही जीवनात बदल होतो. काय आता सांगावे. सद्‌गुरुच ही सेवा आपल्याकडून करवून घेत आहेत. ह्या सेवेतूनच हळूहळू आत्मज्ञानाची ओळख सद्‌गुरू करून देत आहेत. ह्या सेवेतूनच आता आत्मज्ञानी करावे हीच सद्‌गुरूचरणी प्रार्थना आहे.
या पुस्तकाच्या निर्मितीमध्ये मला अनेकांनी मोठे सहकार्य केले. विशेषतः माझे नातेवाईक माजी महापौर शिवाजीराव कदम, गुरुदत्त शुगर वर्क्‍सचे घाटगे आदींनी मोलाची मदत केली. या पुस्तकाचे मुखपृष्ठ कसे असावे, यावर बराच विचार झाला. काही कल्पना मांडून अनेकांची मते घेतली. असेच घेताना दैनिक सकाळमधील प्रदीप घोडके यांनी स्वतः मुखपृष्ठ करून देण्याचे आश्‍वासन दिले. त्यानुसार त्यांनी सुंदर, आकर्षक, आजच्या पुस्तकांच्या बाजारपेठेत चालू शकेल असे मुखपृष्ठ तयार करून दिले. याबद्दल त्यांचे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत. घोडके काका यांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांना सल्ला घ्यावा म्हणून काही नमुने दाखवले तर त्यांनी ती कल्पना लगेचच प्रत्यक्षात करून दिली. इतकी सहजता त्यांच्या कामात आहे. अध्यात्मामध्ये सहजपणाला अधिक महत्त्व आहे. उत्स्फूर्तपणे एखादी कल्पना सहजपणे मांडणे तितके सोपे नसते. ते आतून यावे लागते. अंतःकरणातून ही सहजता येते. पुस्तकाच्या या कामात अनेकांचे सहकार्य लाभले, यामध्ये प्रसाद इनामदार, विजय वेदपाठक, नितीन सुतार, अभय कोडोलीकर, विनय
गुरव, जगदीश जोशी आदींचेही सहकार्य लाभले. त्यांचाही मनःपूर्वक आभारी आहे. गणेश प्रिंटर्सचे विजयराव थोरवत यांनी छपाई वेळेत करून सहकार्य केले. अथर्व प्रकाशनचे अनुभव ज्ञानेश्‍वरी हे पहिलेच पुस्तक प्रकाशित होत आहे.
प्रकाशनाच्या अनुषंगाने अनेक गोष्टींची माहिती असणे आवश्‍यक असते. यामध्ये कोल्हापुरातील अक्षरदालनचे अमेय जोशी व रावा प्रकाशनचे राहुल कुलकर्णी यांनीही बहुमोल सहकार्य केले. विशेषतः जोशी यांनी पुस्तकामध्ये अनेक बदल सुचवले. बाजारपेठेमध्ये कशा पद्धतीच्या पुस्तकांना मागणी असते, त्यानुसार आवश्‍यक ते बदल करावे लागतात. भावनिक मुद्दे बाजूला ठेवून पुस्तकामध्ये काही बदल हे गरजेचे असतात. त्यांनी सांगितलेल्या या सूचना पुस्तकनिर्मितीमध्ये निश्‍चितच उपयोगी
ठरल्या. अक्षरदालन व रावा प्रकाशन या दोघांचाही मी ऋणी आहे.
वाचक हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. या पुस्तकालाही वाचकांचा भरघोस प्रतिसाद लाभेल अशी आशा करतो. सद्‌गुरूंच्या कृपेने ज्ञानेश्‍वरीची ही सेवा अशीच अखंड सुरू राहावी. यापुढील कृषी ज्ञानेश्‍वरी या पुस्तकाची निर्मिती लवकरात लवकर
व्हावी. आपल्या सहकार्याने व सद्‌गुरूंच्या आर्शीवादाने हे कार्य निश्‍चितच तडीस जाईल, असा विश्‍वास मला वाटतो.

राजेंद्र घोरपडे, कोल्हापूर
9011087406