Sunday, March 13, 2011

महालक्ष्मी

पै निर्धना घरीं वानिवसे । महालक्ष्मीचि येऊनि बैसे ।
तयाते निर्धन ऐसें । म्हणों ये काई ।।

जपान जगात आघाडीवर आहे. तंत्रज्ञानात त्यांनी मोठी क्रांती केली आहे. कितीही संकटे आली तरी ते नेहमी ताठ मानेने उभे राहीले आहेत. भूकंप हा तर त्यांना नेहमीचाच आहे. पण यामुळे त्यांच्या प्रगतीचा वेग काही कमी झाला नाही. प्रयत्नातही त्यांनी कधी कसूर मागे ठेवली नाही. चोविस तास कष्ट करण्याची त्यांची तयारी असते. असे कष्ट भारतीयांनी केले असते तर भारतही जगात महासत्ताक झाला असता. आपण महासत्ताक होण्याची नुसती स्वप्नेच पाहात आहोत. भारतीयात जीव तोडून कष्ट करण्याची तयारी नाही. तशी त्यांची मानसिकता दिसून येत नाही. स्वार्थी वृत्तीने देश पोखरला गेला आहे. देशात आवश्‍यक गोष्टींची मुबलकता असेल तर कष्ट करण्याची मानसिकता नसते. भारताची पिक्षेहाट याचमुळे झाली आहे. देश यामुळेच आळसी बनला आहे. देशात पाण्याची मुबलकता आहे. शेतीची जमिनही सुपिक आहे. आवश्‍यक तेवढे उत्पादनही होते. यामुळे देशात समृद्धी आहे. गरजेपूरते कष्ट करण्याची तयारी भारतीयामध्ये आहे. पण भ्रष्टाचार आणि द्वेषभावनेने देश पोखरला जात आहे. नैसर्गिक आपत्ती कमी येते. जपानमध्ये नैसर्गिक आपत्तीची मालीकाच असते. भुकंप, तर कधी त्सुनामी. यांनी त्या देशाच्या प्रगतीस नेहमीच आव्हान दिले आहे. तरीही तो देश प्रगतीपथावर आहे. संकटातूनच खरी प्रगती होत राहते. संकटे सहन करण्याची ताकद अंगात निर्माण व्हायला हवी. प्राप्त परिस्थितीशी सामना करण्याची नेहमीच तयारी ठेवायला हवी. यातूनच प्रगती होते. इस्राईलमध्ये पाण्याची कमतरता आहे. पण त्यांनी उपलब्ध पाण्याच्या जोरावर शेतीत भरघोस उत्पादने घेतली आहेत. तसे तंत्रज्ञान विकसीत केले आहे. आपल्या देशात हे होऊ शकले नाही. आपण त्यांचा आदर्शही घेऊ शकत नाही. आपणकडे पाण्याची मुबलकता असूनही आपण आघाडी मिळवू शकलो नाही. सांगण्याचा हेतू इतकाच की कितीही संकटे आली तरी प्रगती करण्याची तयारी ठेवायला हवी. मन खचता कामा नये. संकटांचा सामना करूनच मोठी प्रगती साधता येते. कितीही उंचीवरून खाली पडले तरी मांजराप्रमाणे ताठ उभे राहता यायला हवे. कष्ट करणाऱ्याच्या घरी, संकटांचा सामना करण्याचे सामर्थ ठेवणाऱ्यांच्या घरी महालक्ष्मी निश्‍चितच नांदते यावर विश्‍वास ठेवायला हवा.

राजेंद्र घोरपडे, कोल्हापूर 9011087406